भूमिकेत हरवली…
तू ‘मोमो’ या भूमिकेत हरवून जातेस, असं तुझ्या सहकलाकारांकडून कळतं असं विचारताच मीरा म्हणते, ‘हे खरं आहे. सहकलाकारांशी बोलताना अगदी माझ्या पालकांशी बोलतानाही मी मोमो बोलते तसेच उच्चार करते तसं बोलायची सवयच झाली आहे. घरी गेल्यावरही तसं बोलले, की भूमिकेतून बाहेर ये गं, असं सगळे सांगतात. ही भूमिका चाहत्यांना आवडतेय हे कळलं, की भूमिका साकारायला आणखी मजा येते. ऑडिशन दिलं तेव्हा अमेरिका रिटर्न मुलगी एवढीच तिची ओळख होती. हळूहळू ती भूमिका फुलत गेली. मी तिच्याएवढा मेकअप कधीच करत नाही आणि तशी अजिबातच नाही, त्यामुळे ही भूमिका साकारणं हे आव्हान होतं.’
सेटवर जमली मैत्री
मालिकेतल्या सहकलाकारांशी तिची उत्तम गट्टी जमली आहे. त्याविषयी ती म्हणते, ‘मालिकेचा पहिला दिवस होता आणि माझं चित्रीकरण शुभांगी गोखले आणि अदिती सारंगधर या कसलेल्या कलाकारांसोबत होतं. भीती वाटली. त्यांनी खूप धीर देत समजून घेतलं. तिथं अदिती माझी एवढी काळजी घेत होती, की मला आईची आठवण यायची. मी तिच्याजवळ रडायचेही. मालिका असो किंवा वैयक्तिक काही सांगणं, तिनं खूप समजून घेतलं. तिचा सल्ला नेहमीच माझ्यासाठी मोलाचा आहे. शुभांगीताई समोर आल्यावरही मला आईची आठवण येते. घरापासून दूर असल्यानं आम्ही हॉटेल रूममध्येच किचन तयार केलं. अदितीचं चित्रीकरण सुरू असेल, तेव्हा मी जेवण तयार करते आणि एरवी ती करते.’
.
मानसिक आरोग्य…
गेला काही काळ कलाकारांसाठी कठीण होता. मीरा म्हणते, ‘तशी मी खूप उत्साही आहे. मुंबईत गेली चार वर्षं एकटी राहत आहे. तिथं सरावण्यासाठी वेळ जातो. चित्रीकरणासाठी बाहेरच्या राज्यात आल्यावर आम्ही बायोबबलमध्ये काम करत आहोत. घराच्या बाहेर असणं किंवा काम झाल्यावरही घरी जायचं नाही; तर रूममध्ये जायचं, हा विचारही तणावात नेणारा होता. आधी हे प्रकरण खूप त्रासदायक वाटलं. एकमेकांना धीर देत आम्ही काम करत आहोत. कुणी पालकांपासून, तर कुणी मुलाबाळांपासून दूर आहे. इथं आल्यावर चौकटीबाहेरचं आयुष्य जगणं काय असतं, हे कळतंय. आता बाहेर प्रवास करायची नितांत गरज आहे. योग, जॉगिंग आणि योग्य आहार असं गणित आम्ही सहकलाकारांनी जमवलं आहे. अदिती आणि मी दोघीही फिटनेसप्रेमी असल्यानं ते जमून जातं.’
भटकंतीनं झाले समृद्ध
सोलो ट्रॅव्हलर म्हणूनही भटकणं मीराला आवडतं. ती म्हणते, ‘एकट्यानं भटकणं यासारखा दुसरा आनंद नाही. किती बजेटमध्ये तुम्ही काय काय फिरू शकता, हे कळतं. अनुभव समृद्ध करत जातात. ज्या माणसांना तुम्ही ओळखतही नाही, अशी माणसं, त्यांचे स्वभाव, प्रथा-परंपरा, खाद्यसंस्कृती या सगळ्याचा अनुभव येतो. हे भटकणं तुम्हाला एका वेगळ्या विश्वाची ओळख करून देतं. चौकटीबाहेरचं जगायला आणि माणसाबद्दल माणूस म्हणून विचार करायला शिकवतं. हिमाचल प्रदेश इथं भटकून आल्यावर मला स्वतःसाठी भ्रमंतीच्या एक्या वेगळ्या विश्वाचं दार खुलं झाल्याची जाणीव झाली. प्रत्येकानं एकदा तरी असा अनुभव घ्यायला हवा.’
पर्यावरणाबाबत संवेदनशील होण्याची वेळही टळून गेली आहे. आपण जितके पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अवलंब करू तितके अधिक कणखर होवू. याचा विचार करायला हवा.
मीरा जगन्नाथ