Home ताज्या बातम्या रविशंकर प्रसाद:राहुल गांधी करोना विरोधी लढा कमकुवत करीत आहेत

रविशंकर प्रसाद:राहुल गांधी करोना विरोधी लढा कमकुवत करीत आहेत

नवी दिल्ली: सत्याचा विलाप करून आणि लोकांना दिशाभूल करणारी माहिती देऊन कॉंग्रेसचे नेते राहुूल गांधी हे देशाचा करोना विरूद्धचा लढा कमकुवत करीत आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज हा आरोप केला. ते म्हणाले की, खुद्द कॉंग्रेस शासित राज्याचे मुख्यमंत्रीही राहुल गांधी यांच्या सूचनांचा विचार करीत नाहीत असेही ते म्हणाले.

लॉकडाऊन किंवा गरीबांना थेट आर्थिक मदत करण्याची त्यांची सूचना कॉंग्रेस शासित राज्यातही अंमलात आणली जात नाही. राहुल गांधी हे केवळ प्रसिद्धीसाठी लोकांची दिशाभूल करणारी माहिती प्रसारीत करीत आहेत, असा आरोपही रविशंकर प्रसाद यांनी केला.

करोनाच्या विरोधातला लढा कोण कमकुवत करीत आहे, अशा नावाने भाजपने आज एक पुस्तीकाच प्रकाशित केली असून त्यात त्यांनी मोदी सरकारने करोनाच्या अनुषंगाने केलेल्या उपाययोजना आणि कॉंग्रेसच्या नेत्यांनी केलेली वक्तव्ये याची माहिती या पुस्तिकेत दिली आहे. प्रसाद म्हणाले की पंतप्रधान मोदींनी करोनाशी लढा देण्याचे धैर्य दाखवले व त्यासाठी लोकांना एकत्र केले. पण या लढ्यातील प्रत्येक कृतीवर राहुल गांधी यांनी टीका करून भलतेच आरोप केले. देश एकजुटीने करोनाचा लढा देत असताना राहुल गांधी यांनी सातत्याने हा लढा कमकुवत करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी केवळ नकारात्मकता पसरवली असा दावाही त्यांनी केला.