Home शहरे अकोला रायगडमधील प्रलंबित रस्ते कामांना गती द्या; मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील रस्त्यांचे मोजमाप...

रायगडमधील प्रलंबित रस्ते कामांना गती द्या; मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील रस्त्यांचे मोजमाप व सीमांकन तातडीने पूर्ण करावे – मंत्री आदिती तटकरे

रायगडमधील प्रलंबित रस्ते कामांना गती द्या; मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील रस्त्यांचे मोजमाप व सीमांकन तातडीने पूर्ण करावे – मंत्री आदिती तटकरे


मुंबई, दि. १०: रायगड जिल्ह्यातील मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत प्रलंबित रस्ते आणि पाणंद रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया गतिमान करावी. गावनकाशावर असलेल्या रस्त्यांच्या कामांची सद्य:स्थिती दर्शविणारा सविस्तर अहवाल सादर करावा; तसेच गावनकाशावर नोंद नसलेल्या प्रलंबित रस्त्यांचे मोजमाप आणि आवश्यक सर्वेक्षणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करून रस्ते विकासाच्या कामांना गती द्यावी, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.

मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत रायगड जिल्ह्यातील मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गतचे रस्ते, पाणंद आणि प्रलंबित रस्ते विकास कामांचा; तसेच राष्ट्रीय महामार्ग कोशिंबळे मार्गाशी संबंधित कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री तटकरे यांनी सांगितले की, लोकसंख्या एक हजारपेक्षा अधिक असलेल्या गावांमधील रस्ते विकास कामांना प्राधान्य द्यावे. ग्रामीण भागातील नागरिकांना दळणवळणाच्या चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि विकासाच्या मुख्य प्रवाहाशी गावांचा संपर्क अधिक सक्षम व्हावा, यासाठी रस्ते प्रकल्प वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे.

श्रीवर्धन तालुक्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत प्रस्तावित रस्त्यांच्या कामांसाठी आवश्यक पॅनल तयार करून मंजुरी प्रक्रियेला गती द्यावी. रस्त्यांच्या मंजुरीसाठी आवश्यक असलेल्या प्रशासकीय बाबी वेळेत पूर्ण करून कामे प्रत्यक्ष सुरू करण्यावर भर देण्यात यावा.

रायगड जिल्ह्यातील प्रलंबित १९ रस्त्यांचे सीमांकन तातडीने पूर्ण करून संबंधित कामांना गती द्यावी.ग्रामीण भागातील रस्ते विकास हा नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी आणि स्थानिक अर्थव्यवस्थेशी निगडित विषय आहे. त्यामुळे कोणत्याही प्रशासकीय अडचणींमुळे कामे रखडू नयेत यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करावे.मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमुळे दुर्गम आणि ग्रामीण भागातील गावांना दर्जेदार रस्ते सुविधा उपलब्ध होत असून, शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि बाजारपेठांपर्यंत पोहोच सुलभ होत आहे. त्यामुळे प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी विशेष लक्ष द्यावे, असे निर्देशही मंत्री तटकरे यांनी दिले.

०००

श्रद्धा मेश्राम/विसंअ

 

 



Source link

error: Content is protected !!
WhatsApp chat