Home ताज्या बातम्या रायगडावरील २ जूनच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे सूक्ष्म नियोजन करावे – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

रायगडावरील २ जूनच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे सूक्ष्म नियोजन करावे – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

0
रायगडावरील २ जूनच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे सूक्ष्म नियोजन करावे – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

                    मुंबई, दि. 10 : छत्रपती शिवाजी महाराज ही आपली अस्मिता आहे, प्रत्येक मराठी माणसाचा श्वास आहे. येणारे वर्ष शिवराज्याभिषेक सोहळ्याचे ३५० वे वर्ष आहे. यानिमित्त २ जून रोजी रायगडावर राज्य सरकारकडून आयोजित कार्यक्रमाचे सूक्ष्म नियोजन करण्यात यावे. संपूर्ण जगातील लोक या सोहळ्याकडे कुतुहलाने बघत असून राज्य शासन करत असलेल्या तयारीत शिवप्रेमींना सोबत घेऊन हा सोहळा भव्यदिव्य आणि देखणा व्हावा यासाठी शिस्तबद्ध तयारी करावी, अशा सूचना राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज अधिकाऱ्यांना दिल्या.

            श्री. मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली आज शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तयारीबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला आमदार भारत गोगावले, महेंद्र थोरवे, गोपीचंद पडळकर, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, चित्रपट महामंडळाचे व्यवस्थपकीय संचालक डॉ.अविनाश ढाकणे, उपसचिव विलास थोरात, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे, शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, रायगडचे अध्यक्ष सुनील पवार यांच्यासह रायगडावर दरवर्षी हा सोहळा आयोजित करणारे शिवप्रेमी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

            यावेळी श्री. मुनगंटीवार म्हणाले की, कार्यक्रमाच्या संदर्भात एका समितीची स्थापना करण्यात यावी या समितीमध्ये प्रामुख्याने सांस्कृतिक कार्य विभागाचे अधिकारी, पर्यटन विभागाचे अधिकारी, पोलीस विभागाचे अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी, सर्व प्रमुख विभागाचे अधिकारी असावेत. समिती तयार केल्यानंतर समितीची उपसमिती तयार करुन जबाबदाऱ्या निश्चित करण्यात याव्यात. कामाचे योग्य पद्धतीने वाटप करुन पूर्ण कार्यक्रमाचे सूक्ष्म नियोजन करण्यात यावे, अशा सूचनादेखील त्यांनी दिल्या.

            हवामान खात्याच्या माध्यमातून ०१ ते ०७ जूनपर्यंत हवामानाबद्दल माहिती घेऊन तसे नियोजन व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आवश्यक असल्यास गडावर बॅटरी ऑपरेटेड वाहने, समाधीची उत्कृष्ठ सजावट, आरोग्यविषयक सर्व सोयी-सुविधा व पिण्याच्या पाण्याची उपलब्धता योग्य प्रमाणात करावी, अशा सूचना दिल्या.

            प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी हा सोहळा कसा असेल याचे सादरीकरण केले. राज्याभिषेक करण्यासाठी १००८ जल कलश पूजनाचे आणि रथाचे नियोजन या बाबत देखील बैठकीत चर्चा झाली.

००००

वर्षा आंधळे/विसंअ/