Home ताज्या बातम्या राष्ट्रपती राजवटीमुळे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष बंद; 5 हजार गरजूंना फटका

राष्ट्रपती राजवटीमुळे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष बंद; 5 हजार गरजूंना फटका

0

मुंबई: राज्यातील सत्तासंघर्षाचा फटका गरीब आणि गरजूंना बसू लागला आहे. राज्यात सरकारच अस्तित्वात नसल्यानं मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष बंद करण्यात आला आहे. त्यामुळे उपचारांसाठी मदत कुठून आणि कशी मिळवायची असा प्रश्न राज्यभरातून मुंबईत आलेल्या अनेकांना पडला आहे. मंत्रालयातील मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाबाहेर गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र कक्षच बंद असल्यानं आता जायचं कुठे असा यक्षप्रश्न गरजूंसमोर उभा राहिला आहे. 

राज्यभरातून आलेल्या गरजूंना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत केली जाते. मात्र राष्ट्रपती राजवट लागू असल्यानं मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष बंद करण्यात आला आहे. ‘कार्यालय बंद. चौकशी करू नये’, असा मजकूर असलेला कागद कक्षाच्या दारावर चिटकवण्यात आला आहे. त्यामुळे राज्याच्या विविध भागांमधून मदतीच्या आशेनं आलेल्या अनेकांचा भ्रमनिरास होत आहे. जवळपास ५ हजार जणांना याचा फटका बसला आहे. 

राज्याच्या कानाकोपऱ्यातून दररोज शेकडो गरजू मंत्रालयात येतात. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळेल, या आशेनं येणाऱ्या अनेकांना सध्या रिकाम्या हातानं परतावं लागत आहे. आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्यांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाची स्थापना करण्यात आली. पूर, दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्तींचा फटका बसलेल्यांना या माध्यमातून आर्थिक मदत केली जाते. याशिवाय या कक्षाच्या माध्यमातून गंभीर आजारांचा सामना करणाऱ्यांनादेखील अर्थसहाय्य करण्यात येतं. २०१४ पासून मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून वैद्यकीय मदत म्हणून ५५० कोटी रुपये देण्यात आलं आहे. याचा लाभ ५६,३१८ रुग्णांना झाला आहे.