हायलाइट्स:
- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज २२वा वर्धापन दिन
- लोकसभा-विधानसभा निवडणूक शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढणार?
- आगामी निवडणुकांवर शरद पवारांनी केलं मोठं विधान
‘शिवसेना आणि आपण एकत्र काम करु शकतो असं कोणाला पटलं नसतं. पण आपण लोकांना पर्याय दिला आणि त्यांनी तो स्वीकारला. तिन्ही पक्षांनी योग्य पावलं टाकली आणि आज महाविकास आघाडी सरकार चांगलं काम करत आहे,’ असं सांगतानाच हे सरकार पुढचे पाच वर्ष टिकणार, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.
आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २२वा वर्धापन दिन साजरा होत आहे. या निमित्तानं मुंबईत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह राष्ट्रवादीचे दिग्गज नेते उपस्थित होते.
‘लोकसभा, विधानसभेत एकत्रित काम करु’
‘महाविकास आघाडीचं सरकार पाच वर्ष टिकेल. इतकंच नव्हे तर लोकसभा, विधानसभेत एकत्रित काम करुन सामान्य जनतेचं देशात आणि राज्यात प्रतिनिधित्व करेल यात शंका नाही,’ असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधानांची भेट घेतली. त्यावेळी एकांतात मोदींनी उद्धव ठाकरेंसोबत चर्चा केली. तेव्हा अनेक शंका घेण्यात आल्या. पण शिवसेना विश्वासाचा पक्ष आहे. शिवसेनेसोबत आपण कधी काम केलं नाही पण महाराष्ट्र शिवसेनेलासुद्धा कित्येक वर्षांपासून पाहत आहे. माझा यासंबंधीचा अनुभव विश्वास असणाराच आहे,’ असं म्हणत शरद पवारांनी पंतप्रधान- मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर भाष्य केलं आहे.
‘जनात पक्षाचं राज्य आलं त्यानंतरच्या कालखंडात निवडणुकीत सगळीकडे काँग्रेस पराभूत झाली. असं असताना काँग्रेसला पाठिंबा देण्यासाठी एक राजकीय पक्ष पुढे आला तो म्हणजे शिवसेना. शिवसेनेनं इंदिरा गांधींना मदत करण्यासाठी विधानसभा निवडणुकीत एकही उमेदवार उभा करणार नाही, असा निर्णय घेतला,’ अशी आठवण शरद पवारांनी सांगितली आहे.
‘बाळासाहेबांनी इंदिरा गांधींना दिलेला शब्द निवडणुक न लढवत पाळला. त्यामुळं कोणी काहीही शंका घेतली तरी शिवसेनेनं त्या कालखंडात ज्या पद्धतीने भूमिका घेतली तीच भूमिका सोडण्यासंबंधी केलं जाईल असं कोणी सांगत असेल तर तसं होणार नाही,’ असा ठाम विश्वास यावेळी शरद पवारांनी व्यक्त केला आहे.
‘या देशात अनेकांनी अनेक पक्ष काढले काही टिकले काही कधी गेले हे कळलंही नाही. पण राष्ट्रवादीचे वैशिष्ट्य आहे की गेले २२ वर्ष शक्ती वाढवण्याठी प्रयत्न केले. पक्षातून काही लोक गेले पण नवीन नेतृत्व तयार झाले. करोना संकटात प्रत्येक नेत्यानं आपली जबाबदारी नीट पार पडली. राजकारणात सतत नव्या नेतृत्वांना संधी दिली पाहिजे. आणि उत्तम काम करायचं असेल तर पाठीशी उभं राहिलं पाहिजं,’ असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.