Home बातम्या ऐतिहासिक विधानपरिषद लक्षवेधी

विधानपरिषद लक्षवेधी

0
विधानपरिषद लक्षवेधी

समाज माध्यमातून आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. २४ : समाज माध्यमातून महामानवांबाबत आक्षेपार्ह लिखाण करून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या समाजकंटकांवर कडक कारवाई होण्यासाठी राज्य शासन लवकरच उच्चस्तरीय समिती  नेमणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविरोधात आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या ‘इंडिक टेल्स’ व ‘हिंदू पोस्ट’ ही संकेतस्थळे तत्काळ बंद करून संकेतस्थळ चालविणाऱ्या व लिखाण प्रसारित करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याबाबत विधानपरिषद सदस्य अमोल मिटकरी यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि त्यांच्या कार्याविषयी खोट्या माहितीच्या आधारे चुकीची मांडणी करून  समाजाच्या भावना दुखावणारा अपमानास्पद लेख इंडिक टेल्स व ‘हिंदू पोस्ट’ या संकेतस्थळ आणि bhardwajspeaks या ट्व‍िटर अकाऊंटधारकाने प्रसारित केला असल्याची बाब ३१ मे २०२३ रोजी प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने निदर्शनास आली आहे. संबंधित पोस्ट व मजकूर लिहिणाऱ्या व प्रसारित करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, यातील आरोपीचा शोध घेण्याकरीता संबंधित संकेतस्थळ व ट्व‍िटरला पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

कायद्यात असलेली जास्तीत जास्त शिक्षा आरोपीला होईल, अशी तरतूद करणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य प्रज्ञा सातव यांनी सहभाग घेतला.

*****

 आयुर्वेद महाविद्यालयातील प्राध्यापकांची रिक्त पदे तातडीने भरणार – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई दि. २४ : आयुर्वेद क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी शासन सकारात्मक प्रयत्न करणार. शासकीय, शासन अनुदानित व खासगी विनाअनुदानित आयुर्वेद महाविद्यालयातील प्राध्यापकांची रिक्त पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून तत्काळ भरणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत दिली.

राज्यातील आयुर्वेदिक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत सदस्य सचिन अहीर यांनी लक्षवेधी मांडली.

मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, राज्यातील विविध आयुर्वेद महाविद्यालयातील पदव्युत्तर आयुर्वेद अभ्यासक्रमाचे प्रवेश हे अखिल भारतीयस्तरावर आयोजित  (AIAPGET) सामायिक प्रवेश परीक्षेच्या गुणवत्तेनुसार केले जातात.

इतर राज्यात पदवी पूर्ण केलेल्या मराठी विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात   आयुर्वेद पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी (अखिल भारतीय कोटा)  15 टक्के जागा राखीव देण्यात आलेल्या आहेत. यात वाढ केल्यास राज्यात पदवी शिक्षण घेतलेल्या स्थानिक मराठी विद्यार्थ्यांवर अन्याय होवू शकतो. त्यामुळे राज्यातून (बीएएमएस)पदवी पूर्ण केलेले विद्यार्थी हे महाराष्ट्राच्या जनतेस आरोग्य सुविधा पुरविण्यास राज्यातच राहतील या उद्देशातून  या विद्यार्थ्यांनाच राज्य राखीव जागेतून प्रवेश दिला जातो. यामध्ये स्थानिक विद्यार्थ्यांचे हित असल्याचेही मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

महाराष्ट्रात शासकीय व शासन अनुदानित आयुर्वेद महाविद्यालयांत सन २०२२-२३ मध्ये एकूण ३०८ इतक्या जागा उपलब्ध होत्या. या पैकी ८५ टक्के जागा या राज्य कोट्याच्या असून, १५ टक्के जागा या अखिल भारतीय कोट्यासाठी दिल्या जातात. तसेच, खासगी विना अनुदानित महाविद्यालयांत  एकूण ८१३ इतक्या जागांपैकी,  खासगी महाविद्यालयातील ७० टक्के जागा राज्य कोट्यासाठी, १५ टक्के जागा अखिल भारतीय कोटा आणि १५ टक्के जागा संस्थात्मक कोट्यासाठी (व्यवस्थापन कोट्यासाठी) उपलब्ध असतात.

अखिल भारतीय कोट्यातील जागा या केंद्र सरकारस्तरावर भरण्यात येत असून या जागांवर देशातील कुठलाही पात्र उमेदवार प्रवेशासाठी अर्ज करू शकतो. उर्वरित जागांवरील प्रवेश हे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाद्वारे केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेमार्फत करण्यात येतात, असेही मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य अभिजित वंजारी यांनी सहभाग घेतला होता.

000

नोंदणी असलेल्या कामगारांनाच मोफत भोजन – कामगार मंत्री सुरेश खाडे

मुंबई, दि. 24 :  इमारत व इतर बांधकाम व्यवसायामधील  बांधकाम कामगारांसाठी, १ जुलै 2023 पासून नोंदणी असलेल्या कामगारांनाच मोफत जेवण वितरित करण्यात येते, असे कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी विधानपरिषदेत सांगितले.

इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळातर्फे इमारत व इतर बांधकाम व्यवसायामधील  बांधकाम कामगारांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनेबाबत लक्षवेधी विधानपरिषद सदस्य एकनाथराव खडसे यांनी मांडली. त्याला उत्तर देताना मंत्री श्री. खाडे बोलत होते.

कामगार मंत्री श्री. खाडे म्हणाले की, इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळातर्फे नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांसाठी विविध योजना राबविल्या जातात. या योजनेत बांधकाम कामगारांसाठी दोन वेळेचे जेवण पुरविण्यात येते. कोविड काळात बांधकाम कामगारांसोबत नाका कामगार आणि नोंद नसलेल्या कामगारांनाही या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. राज्यात संघटित २६ लाख ३८ हजार नोंदणी कामगार असून तीन कोटी ५४ लाख असंघटित कामगार आहेत. कामगाराची  नोंदणी करण्याचे काम अद्यापही सुरू असून याबाबत कोणाच्याही तक्रारी असतील, तर त्याची चौकशी  करू. यामध्ये दोषींवर कारवाई करू. विविध सदस्यांनी केलेल्या सूचनांसाठी लवकरच एक बैठक आयोजित करण्यात येईल.

यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, सदस्य प्रवीण दरेकर, अभिजित वंजारी, सतेज पाटील, शशिकांत शिंदे, सचिन अहीर यांनी सहभाग घेतला.

*****

संध्या गरवारे/विसंअ/