कोल्हापूर : विशाखापट्टणमधून नौदलाचे 15 जणांचे पथक बोटीसह शिरोळमधील पूरग्रस्तांसाठी आज दुपारपर्यंत दाखल होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
पंचगंगा नदीची पातळी सुमारे साडेतीन फुटांपेक्षा जास्त प्रमाणात कमी झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे, असे सांगून जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले शिरोळमधील गावांसाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ, लष्कर, नौदल, तटरक्षकदलाच्या एकूण 45 बोटी आणि पथकांसह पूरग्रस्तांसाठी मदत पोहचवत आहेत. त्यांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करत आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी काल नौदलाच्या अतिरिक्त बोटीसाठी पथकाची मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांनी केंद्रशासनाशी संवाद साधून ही अतिरिक्त मदत मिळविली असून, त्यानुसार आज दुपारपर्यंत विशाखापट्टणम येथून नौदलाच्या अतिरिक्त 15 जणांचे पथक बोटीसह दाखल होत आहे. अलमपट्टीमधूनही विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरु आहे, त्यामुळे शिरोळमधील पूर परिस्थिती नियंत्रणात राहील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.