शाळांमध्ये माजी सैनिकांकडून प्रशिक्षण राष्ट्रनिर्मितीचे सशक्त पाऊल – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे – महासंवाद

शाळांमध्ये माजी सैनिकांकडून प्रशिक्षण राष्ट्रनिर्मितीचे सशक्त पाऊल – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे – महासंवाद
- Advertisement -


मुंबई दि. 28 : राज्यातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शालेय शिक्षण विभागामार्फत ‘आनंददायी शनिवार’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात स्वयंसेवी पद्धतीने काम करणाऱ्या माजी सैनिकांच्या अनुभवातून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याच्या निर्णयामुळे शिस्त, देशभक्ती, नेतृत्वगुण आणि समाजसेवेचे उत्तम उदाहरण असलेल्या माजी सैनिकांचे प्रशिक्षण आता थेट विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार असल्याने राष्ट्रनिर्मितीचे हे सशक्त पाऊल ठरेल, असे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.

माजी सैनिकांमार्फत शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याबाबत मंत्रालयातील दालनात आढावा बैठक झाली. यावेळी पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री शंभुराज देसाई, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, माजी सैनिक कल्याण विभागाचे सचिव पंकज कुमार, सैनिक कल्याण विभागाचे सचिव कर्नल दीपक ठोंगे, उपसचिव चंद्रकांत मोरे, समीर सावंत, अप्पासिंग राजपूत, लेफ्टनंट कर्नल सतेश हंगे, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे अवर सचिव अनिरुद्ध कुलकर्णी उपस्थित होते. शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार हे दुरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

शालेय शिक्षण मंत्री श्री. भुसे म्हणाले की, राज्यात दरवर्षी जवळपास पाच हजार सैनिक सेवानिवृत्त होतात. त्यातील प्रत्येक जिल्ह्यातील स्वयंसेवी पद्धतीने काम करणाऱ्या निवडक आणि गुणवत्तापूर्ण माजी सैनिकांची यादी तयार करून हा उपक्रम कशा पद्धतीने राबविता येईल याविषयीचे सविस्तर नियोजन करण्यात येणार आहे. यामुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील विद्यार्थ्यांना सैनिकी जीवनाची मूलभूत ओळख होणार आहे. या उपक्रमाद्वारे शाळांमध्ये कवायती, शारीरिक प्रशिक्षण, ऐतिहासिक सहली, युद्ध संग्रहालयांना भेटी, प्रेरणादायी व्याख्याने व चित्रफिती यांसारखे उपक्रम प्रभावीपणे राबविले जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, राष्ट्रीय एकात्मतेची भावना आणि सामाजिक बांधिलकी निर्माण होण्यास मदत होणार असल्याचेही मंत्री श्री. भुसे यांनी यावेळी नमूद केले.

सुरूवातीला हा उपक्रम प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात येणार असून त्यानंतर राज्यात सर्व शाळांमध्ये राबविण्याबाबत सूचना देण्यात येणार आहेत. शालेय जीवनात देशसेवेचे बीज रोवण्याचा आणि सशक्त राष्ट्र घडवण्याचा महत्त्वाकांक्षी विचार आता प्रत्यक्षात उतरतो आहे, ही निश्चितच महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असल्याचेही यावेळी श्री.भुसे यांनी सांगितले.

माजी सैनिकांचे अनुभव विद्यार्थ्यांसाठी अमूल्य मार्गदर्शन – माजी सैनिक कल्याण मंत्री शंभुराज देसाई

सेवानिवृत्त सैनिकांकडे केवळ युद्धकलेचेच नाही, तर कठोर प्रशिक्षण, कठीण परिस्थितीशी लढण्याची मानसिकता, आणि सहकार्य यांसारख्या अनमोल कौशल्यांचा ठेवा असतो. हे सर्व गुण विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी उपयुक्त ठरणार आहेत. हा उपक्रम केवळ शिक्षण क्षेत्रातच नव्हे, तर राष्ट्रनिर्मितीच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल ठरणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये लहान वयातच शिस्त, स्वाभिमान, आणि देशासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा यामुळे निर्माण होईल, असा विश्वास माजी सैनिक कल्याण मंत्री शंभुराज देसाई यांनी व्यक्त केला.

या संपूर्ण उपक्रमाचे नियोजन, माजी सैनिकांची निवड, प्रशिक्षण आणि देखरेख यासाठी महाराष्ट्र राज्य सैनिक महामंडळ (MESCO) प्रभावी भूमिका बजावणार आहे. त्यामुळे उपक्रमाची अंमलबजावणी शिस्तबद्ध आणि प्रभावीपणे होण्यासाठी शालेय शिक्षण विभाग आणि माजी सैनिक कल्याण विभाग यांच्या समन्वयाने काम करण्यात येणार आहे.

000

बी.सी.झंवर/विसंअ/

- Advertisement -