Home ताज्या बातम्या शाळेत जाण्यासाठी नदीपात्रातून प्रवास

शाळेत जाण्यासाठी नदीपात्रातून प्रवास

बुलडाणा : मोताळा तालुक्यातील रिधोरा जहाँगीर येथे बस उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना पावसाळ्यात १० किमी फेऱ्याने किंवा नदीपात्रातून जीव मुठीत घेवून शाळेत जावे लागते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी बसफेरी सुरु करण्याची गरज आहे.
एकीकडे शासन विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी करोडो रुपये खर्च करीत आहे. तर दुसरीकडे मोताळा तालुक्यातील रिधोरा जहाँगीर येथील गावातून नळगंगा नदी वाहते. नदीवर पुल नसल्याने विद्यार्थ्यांना नदीच्या पात्रातून मार्ग काढीत विंष्ठवा चिंचपूर मार्गे १० कि.मी. फेºयाने शाळेत जावे लागत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने नदीला मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्याने ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेवून मार्ग काढावा लागत आहे. त्यामुळे याचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरीत परीणाम होत आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांना दररोज २० ते ३० रुपयांचा खर्च करुन विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावे लागत आहे. या त्रासाची मुक्तता व्हावी व गावातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी मोताळा-रिधोरा चिंचपूर मार्गे सकाळी ९.३० वाजता व सायंकाळी ५ वाजता बस सुरु करण्यात यावी, अशी मागणी विभाग नियंत्रकांकडे करण्यात आली आहे. आमदार हर्षवर्धन सपकाळ व परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनाही निवेदन पाठविण्यात आले आहे. आ. सपकाळ यांनी तत्काळ दखल घेत मोताळा चिंचपूरमार्गे रिधोरा बस सुरु करण्याची विभाग नियंत्रकांकडे मागणी केली.