हायलाइट्स:
- शिवसेनेचा माजी आमदार काँग्रेसच्या वाटेवर
- नाना पटोलेंच्या उपस्थितीत करणार पक्ष प्रवेश
- पक्षातील अंतर्गंत वादामुळं निर्णय
शिवसेनेचे उपनेते व माजी राज्यमंत्री अशोक शिंदे हे वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना शिवसेना सरकारमध्ये शिंदेकडे राज्यमंत्रिपद देण्यात आले होते. तसंच, ते शिवसेनेकडून तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. मात्र, १०१४च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा भाजप उमेदवाराकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.
शिवसेनेतील अंतर्गंत वाद व पक्षातील वरिष्ठ नेतृत्वानं योग्य ती दखल न घेतल्यानं अशोक शिंदेंनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत आज दुपारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत अशोक शिंदे पक्ष काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.
वाचाः मोठी बातमी! नाशिकच्या करन्सी नोट प्रेसमधून पाच लाखांच्या नोटा गायब
दरम्यान, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री आपल्यावर पाळत ठेवत असल्याच्या आरोपांमुळं नाना पटोले अडचणीत आले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही त्यांच्या या वक्तव्यावर संताप व्यक्त केला होता. तर, शिवसेनेच्या नेत्यांनीही नाराजी दर्शवली होती. असं असतानाच आज शिवसेनेचे माजी आमदार काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्यानं शिवसेना व काँग्रेसमधील वाद वाढणार का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसंच, एकमेकांचे पदाधिकारी, नेते यांच्या पक्ष प्रवेशाचा गोंधळ टाळण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची समन्वय समिती स्थापन करण्यात आलीय. शिवसेना नेते सुभाष देसाई, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वात ही समिती काम करेल. ही समिती एकमेकांना विश्वासात घेऊनच कार्यकर्त्यांना पक्षात प्रवेश देणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय.
वाचाः राज्यातील ‘या’ जिल्ह्यात बाराशे गुंड; करडी नजर ठेवण्यासाठी पोलिसांचा अॅक्शन प्लान
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनीही मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्राक राष्ट्रवादी व काँग्रेसकडून दुसऱ्या पक्षाचे नेते, कार्यकर्ते फोडण्यापेक्षा शिवसेनेचे नेते, कार्यकर्ते फोडत असल्याचा आरोप केला होता. आपला पक्ष कमकुवत करत असेल तर या स्थितीत भाजपशी जुळवून घ्या असं सरनाईक यांनी म्हटलं होतं.