Home शहरे मुंबई ‘सनराइज’प्रकरणी अहवालाची प्रतीक्षा

‘सनराइज’प्रकरणी अहवालाची प्रतीक्षा

0
‘सनराइज’प्रकरणी अहवालाची प्रतीक्षा

[ad_1]

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
विरार येथील विजयवल्लभ रुग्णालय दुर्घटनेप्रकरणी रुग्णालयाच्या दोन व्यवस्थापकांना अटक होऊन डॉक्टरांसह इतरांवर कारवाई सुरू झाली. मात्र या दुर्घटनेच्या आधी भांडुप येथील ड्रीम मॉलमधील सनराइज रुग्णालयाला लागलेल्या आगीचा अहवाल देखील अद्याप मुंबई महापालिकेने जाहीर केलेला नाही. आगीचे कारण आणि यामागचे गुन्हेगार कोण, त्यांच्यावर काय कारवाई केली, हे जाहीर का करत नाही, असा सवाल बुधवारी स्थायी समितीत करण्यात आला. त्यावर एक आठवड्यात अहवाल जाहीर करू, असे आश्वासन प्रशासनाने दिले आहे.

भांडुप येथील ड्रीम मॉलमध्ये २६ मार्च रोजी आग लागली होती. या आगीत मॉलमधील सनराइज कोविड रुग्णालयातील ११ रुग्णांचा मृत्यू झाला. या आगीनंतर स्थायी समितीच्या बैठकीत जोरदार चर्चा झाल्यानंतर समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी आगीचा अहवाल समितीला सादर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र आगीला तब्बल ४० दिवस पूर्ण झाल्यानंतरही प्रशासनाने अहवाल जाहीर केलेला नाही. याचे तीव्र पडसाद बुधवारी स्थायी समितीत उमटले. विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी यावर हरकतीचा मुद्दा उपस्थित केला होता.

विरार येथील आगप्रकरणी दोन जणांना अटक झाली. कलम ३०४ अन्वये गुन्हा दाखल झाला. मुंबईत इतकी भयंकर दुर्घटना घडूनही गंभीर नाही. ओसी रद्द केली म्हणून रुग्णालय व्यवस्थापन पालिकेच्या विरोधात न्यायालयात गेले आहे. तब्बल अकरा जणांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या या लोकांना तातडीने अटक व्हायला हवी होती. पालिका आयुक्त कुणाला घाबरून कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहेत, असा सवाल राजा यांनी केला. तत्कालीन अग्निशमन दल प्रमुख प्रभात रहांगदळे यांच्या कार्यकाळात रुग्णालयाला अग्निशमन दलाने परवानगी दिली होती. त्यांच्याकडून निष्पक्ष चौकशी कशी होणार, असे राजा म्हणाले.

भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी सर्वसामान्य मुंबईकरांना एक न्याय आणि धनदांडग्यांना दुसरा न्याय असे सनराइज आगीबाबत दिसते आहे, असा आरोप केला. विविध प्रकारच्या चुकांचा पाढा रुग्णालयाने सुरू ठेवला तरी अद्याप कुणावरही कारवाई झालेली नाही. मॉलचा मालक वाधवा हा धनदांडगा असल्याने अद्याप सुरक्षित असल्याचे शिंदे म्हणाले.

सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी रहांगदळे यांनी चौकशी करण्यास विरोध केला. अग्निशमन दल प्रमुख म्हणून विविध प्रकारच्या परवानग्या आणि कारवायांचा संबध येतो. ते अधिकारी चौकशी कशी करणार आणि त्यात तटस्थपणे कुणावर कारवाई होणार, असा सवाल राऊत यांनी केला.

अहवालासाठी एकच अधिकारी

प्रशासनाच्या वतीने उत्तर देताना अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी आगीची चौकशी करणारे उपायुक्त प्रभात रहांगदळे यांना करोना झाल्याने अहवाल देण्यास उशिरा झाला आहे. येत्या आठवडाभरात अहवाल जाहीर करण्यात येईल, असे काकाणी यांनी स्पष्ट केले. त्यावर सर्वपक्षीय नगरसेवकांनी काकाणी यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. पालिकेत एकच अधिकारी अहवाल बनवू शकतो का, अन्य अधिकाऱ्यांकडे अहवाल तयार करण्याची जबाबदारी का देण्यात आली नाही, असे प्रश्न प्रशासनाला विचारण्यात आले.

[ad_2]

Source link