मुंबई, दि. ९ :समाजासाठी व विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींची नावे पद्म पुरस्कारांच्या शिफारशीसाठी अंतिम करण्यासाठी समिती सर्वंकष विचार करणार असून, राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांशीही ऑनलाइन बैठक घेऊन विविध क्षेत्रांतील मान्यवरांची नावे मागविण्यात येणार असल्याचे पद्म पुरस्कार समितीचे अध्यक्ष तथा राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.
२६ जानेवारी २०२७ रोजी जाहीर होणाऱ्या पद्म पुरस्कारांसाठी (पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री) महाराष्ट्रातील योग्य मान्यवरांच्या नावांची शिफारस करण्याबाबत स्थापन करण्यात आलेल्या राज्यस्तरीय समितीची आढावा बैठक मंत्रालयात समितीचे अध्यक्ष तथा राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस समितीचे सदस्य तथा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, पर्यावरण व वातावरणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे आणि महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे उपस्थित होत्या.
बैठकीत २०२७ च्या पद्म पुरस्कारांसाठी केंद्र शासनाकडे पाठविण्यात येणाऱ्या शिफारशींचा आढावा घेण्यात आला. तसेच कला, वैद्यकीय आणि शिक्षण क्षेत्रातील विविध मान्यवरांच्या नावांवर प्राथमिक चर्चा करण्यात आली. मंत्री रावल म्हणाले की, पद्म पुरस्कारांसाठी अशा व्यक्तींची निवड व्हावी, ज्यांचे कार्य समाजहिताचे, प्रेरणादायी आणि दीर्घकालीन प्रभाव निर्माण करणारे आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमधून अशा व्यक्तींची माहिती संकलित करण्यासाठी लवकरच जिल्हाधिकाऱ्यांसोबत ऑनलाइन बैठक आयोजित करण्यात येणार आहे.
0000






















WhatsApp