सरपंच ग्रामविकासाचे दूत – रोहयो मंत्री भरत गोगावले – महासंवाद

सरपंच ग्रामविकासाचे दूत – रोहयो मंत्री भरत गोगावले – महासंवाद
- Advertisement -




छत्रपती संभाजीनगर, दि.१२ (जिमाका)- सरपंच ग्रामीण विकासात शासन आणि ग्रामस्थांचा दुवा म्हणून काम करतात. गावाच्या विकासासाठी सरपंच ग्रामविकासाचा दूत असतात, त्यामुळे ग्रामविकासातील त्यांची भूमिका महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन रोजगार हमी व फलोत्पादन विभागाचे मंत्री भरत गोगावले यांनी आज येथे केले.

सिडको येथील सागर लॉन्स येथे सरपंच परिषदेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री. गोगावले हे होते. यावेळी पालकमंत्री संजय शिरसाट, आमदार प्रदीप जयस्वाल, माजी महापौर नंदकुमार घोडेले, जिल्ह्यातील सरपंच  उपस्थित होते.

श्री. गोगावले म्हणाले, सरपंच विकास परिषदेच्या माध्यमातून सरपंचांना मार्गदर्शन, संवाद व ग्रामीण विकासाबाबत माहिती होणे आवश्यक आहे. ग्रामीण विकासामध्ये रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून गावाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शेती, फळ पिकाची लागवड आणि पशुपालनाचा जोड व्यवसायास केंद्र शासन व राज्य शासनाने भरीव प्रमाणात निधी उपलब्ध करून देत आहे. या निधीचा वापर शेतकऱ्यांनी स्वतःच्या आर्थिक विकासासाठी करावा व यामध्ये सरपंचांनी शेतकऱ्यांच्या व गावातील गावकऱ्यांच्या विकासासाठी समन्वयक म्हणून महत्त्वाचा दुवा होण्याचे काम  करावे असे सांगितले. गावातील पायाभूत विकासाला जोड देत आधुनिक विकास करण्यासाठी विविध योजना गावांमध्ये राबवून गावाचा विकास करण्याचे आवाहन यावेळी गोगावले यांनी केले.

पालकमंत्री शिरसाट म्हणाले की, गोरगरिबांची सेवा करण्याचा अधिकार सरपंचांना सरपंच म्हणून निवडून आल्यावर येतो तो त्यांनी लोकहितासाठी वापरावा.







- Advertisement -