Home ताज्या बातम्या सहा जिल्ह्यांत मोफत शिवभोजन

सहा जिल्ह्यांत मोफत शिवभोजन

0
सहा जिल्ह्यांत मोफत शिवभोजन

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

अतिवृष्टी व महापुरामुळे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. येथील पूरग्रस्तांना राज्य सरकारकडून मोफत अन्नधान्य आणि केरोसिनचे वाटप केले जाणार आहे, अशी माहीती अन्न नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी दिली आहे. आपत्तीग्रस्त भागांत मोफत शिवभोजन थाळीचे वितरण दुप्पट क्षमतेने केले जाईल. याबाबत आदेशाची वाट न बघता तातडीने मदतकार्य सुरू करण्यात यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

पूर परिस्थीतीमुळे अनेक जिल्ह्यांत वीजपुरवठा खंडित झाला आहे. अशाठिकाणी मोफत केरोसीन वाटप करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी शिवभोजन केंद्र वाहून गेले आहे किंवा पाण्यात आहे तेथे इतर ठिकाणावरून शिवभोजनाचे पाकिटे वितरीत करण्यासाठी परवानगी दिली आहे. पाकिटांच्या वितरणासाठी त्याचप्रमाणे वीज नसलेल्या ठिकाणी किंवा शिवभोजन अॅपसाठी कनेक्टिव्हिटी नसलेल्या ठिकाणी थाळीच्या नोंदणीसाठी स्थानिक पातळीवर तहसीलदारांनी त्यांच्या यंत्रणेचा वापर करावा, अशा सूचना दिल्या आहेत. आपत्तीग्रस्त सहा जिल्ह्यांत प्रति कुटुंब १० किलो गहू, १० किलो तांदूळ आणि पाच लिटर केरोसिनचा मोफत पुरवठा केला जाईल. त्याचप्रमाणे गहू नको असेल त्यांना गव्हाऐवजी तांदूळ दिले जातील. प्रत्येक कुटुंबाला पाच किलो डाळ देण्याचाही निर्णय घेतला आहे.

Source link