हायलाइट्स:
- महाराष्ट्राची संपूर्ण लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल?
- सांगलीनंतर आणखी एका जिल्ह्यात लॉकडाऊनचा निर्णय
- करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येचा पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांची घोषणा
‘जिल्ह्यामध्ये सद्धा ऑक्सिजनची गरज वाढत चालली आहे. रूग्णसंख्या आणखी वाढत राहिली तर ऑक्सिजनची अधिक गरज लागेल. वाढती रूग्णसंख्येची साखळी तोडण्यासाठी उद्या (५ मे) 11 वाजल्यापासून जिल्ह्यात कडकडीत लॉकडाऊन करावा,’ अशा सूचना सतेज पाटील यांच्याकडून देण्यात आल्या.
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयानेही लॉकडाऊनचा पर्याय सुचवला आहे. रूग्णसंख्या थांबविण्यासाठी लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करावे. पोलिसांनी त्याची अंमलबजावणी करावी.
जिल्हाधिकारी नेमकं काय म्हणाले?
‘गेले दोन दिवस रूग्णसंख्येत वाढ कमी असली तरी पॉझिटिव्हिटीचा दर कमी नाही. जिल्ह्यातील २४०० रूग्ण ऑक्सिजनवर आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात सांगली, सिंधुदुर्ग, निपाणी, बेळगाव भागातील ऑक्सिजन जिल्हयातून पुरवला जात आहे,’ असं म्हणत कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जिल्ह्यातील भीषण वास्तवाबाबत माहिती दिली आहे.
या बैठकीत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी दौलत देसाई, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलंडे, जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके उपस्थित होते. तसंच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर हे दूरदृश्यप्रणालीव्दारे बैठकीत सहभागी झाले होते.
दरम्यान, सांगली जिल्ह्यातही संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. बुधवार दि. ५ मे रोजी मध्यरात्रीपासून जिल्ह्यात ८ दिवसांचा कडक लॉकडाऊन लावला जाईल, असं पालकमंत्री जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.