सागरी सुरक्षेसोबतच मत्स्योत्पादन वाढीसाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर महत्त्वाचा – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

सागरी सुरक्षेसोबतच मत्स्योत्पादन वाढीसाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर महत्त्वाचा – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे
- Advertisement -

मुंबई, दि. 24  सध्याचा काळ हा एआय तंत्रज्ञानाचा काळ आहे. सागरी सुरक्षा बळकट करणे आणि मत्स्योत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केले. मंत्रालयात आज सागर किनाऱ्यांवर होणारी घुसखोरी रोखणे आणि सागरी सुरक्षा बळकट करणे, तसेच सागरी आणि गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादनात वाढ करण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर याविषयी मंत्री श्री. राणे यांनी देशभरातील एआय तंत्रज्ञानाविषयी काम करणाऱ्या विद्यार्थ्यांशी आज संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

चर्चेच्या सुरवातील मत्स्य व्यवसाय व बंदरे विभागाची एआय तंत्रज्ञानाबाबतची गरज व्यक्त करुन मंत्री श्री. राणे म्हणाले की, मत्स्योत्पादनात वाढ आणि सागरी सुरक्षा ही विभागाची प्राथमिकता आहे. सागरी मासेमारी आणि गोड्या पाण्यातील मासेमारी असे दोन वेगवेगळे भाग आहेत. या दोन्ही क्षेत्रामध्ये उत्पादन वाढ करण्यासाठी एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कशा प्रकारे नियोजन करता येईल. राज्याला 720 किलोमीटर लांबीचा सागर किनारा लाभला आहे. या सागर किनाऱ्याच्या सुरक्षेसाठी सध्या ड्रोनचा वापर केला जात आहे. त्यातून जमा झालेल्या माहितीचा वापर करून सागरी सुरक्षा आणखी बळकट करण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर कशा प्रकारे करता येईल याविषयी विद्यार्थ्यांनी विचार करावा. तसेच विभाग स्वयंपूर्ण करणे, विभागाचा महसूल वाढवणे, मत्स्य व्यवसायातील, बंदरांच्या विकासातील अडचणी सोडवणे, अंमबजावणीमध्ये असलेल्या काही त्रुटींची पुर्तता करणे, विभागाचा संपूर्ण कारभार पारदर्शक करणे यासह अधिकाऱ्यांची कार्यक्षमता वाढवून विभागाचे कामकाज आणखी प्रभावीपणे करण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करणे याविषयीही सविस्तर सादरीकरण विद्यार्थ्यांनी तयार करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

पारंपरिक मच्छिमार आणि पर्ससिन मच्छिमार असा एक फरक असला तरी राज्यातील किनारपट्टीच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये मासेमारीच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्यामुळे एकाच पद्धतीची योजना किंवा व्यवस्था सर्वच जिल्ह्यांमध्ये लागू करणे व्यवहार्य ठरणार नाही. तर प्रत्येक जिल्ह्याची वेगवेगळी गरज लक्षात घेऊन त्याप्रमाणे एआय तंत्रज्ञानाची प्रणाली विकसीत करण्यात यावी असेही मंत्री राणे म्हणाले.

यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी सुरक्षा आणि उत्पादन वाढीसाठी एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून करावयाच्या उपायांविषयी नवनवीन संकल्पना सुचविल्या. त्यामध्ये मच्छिमारांसाठी मुख पडताळणी (फेस रेक्गनिशन) प्रणाली तयार करणे, किनारा मॅपिंग करणे, जीपीएस फेन्सिंग लावणे, तलावांचे मॅपिंग करणे, राज्यातील एखाद्या जिल्ह्यामध्ये प्रायोगिक तत्वावर एआय तंत्रज्ञान अधारित विकास प्रकल्प राबवण्यात यावा आणि त्यातून होणारे फायद्यांचे एक रोल मॉडेल तयार करून संपूर्ण राज्यात त्याप्रमाणे योजना राबवावी, सागरी सुरक्षेविषयी एक स्वंतंत्र एआयचे मॉडेल तयार करावे, मॅपिंगच्या माध्यमातून मासेमारी क्षेत्राची माहिती देणारे मॉडेल तयार करणे, मासेमारीसह हवामान आणि योग्य परिस्थितीचा अंदाज वर्तवणारे एआय अधारित मॉडेल तयार करणे अशा संकल्पना विद्यार्थ्यांनी यावेळी मांडल्या.

विद्यार्थ्यांनी मांडलेल्या या संकल्पनांच्या दृष्टीने जीवायएएन (GYAN) यांनी एक परिपूर्ण सादरीकरण तयार करावे. या संकल्पनांच्या माध्यमातून सागरी सुरक्षा बळकटीकरण आणि मत्स्योत्पादन वाढ यासाठी कसा वापर करता येईल याचा प्रत्यक्ष कृती आराखडा तयार करावा. आपण तयार करत असलेले हे मॉडेल देशासाठी मार्गदर्शक ठरणारे असेल. तसेच राज्याला मासेमारी क्षेत्रात अग्रेसर ठेवण्यासाठीही याचा उपयोग होणार असल्याचे मंत्री राणे म्हणाले.

यावेळी जीवायएएन (GYAN) चे योगेश राव यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. तर डॉ. उमेश राऊत, नकुल प्यासी यांच्यासह देशभरातील विविध शहरातील विद्यार्थी दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

00000

हेमंतकुमार चव्हाण/वि.सं.अ

- Advertisement -