Home बातम्या साताऱ्यातील सभेनंतर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना लढण्याची प्रेरणा मिळाली : अमोल कोल्हे

साताऱ्यातील सभेनंतर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना लढण्याची प्रेरणा मिळाली : अमोल कोल्हे

0

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपा-शिवसेना युतीला वर्चस्व मिळालं आहे. मात्र, भाजपा आणि शिवसेनेच्या जागा यंदाच्या निवडणुकीत घटल्या आहेत. तुलनेत, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने चांगलं यश संपादन केले . यावर राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी पहिल्यांदाच माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादीचं यश हे महाराष्ट्रातील संपूर्ण कार्यकर्त्यांच्या मेहनतीचं फळ असल्याचं म्हटलंय. तसेच, शरद पवार यांची साताऱ्यातील सभा राजकारणाला वेगळ वळण देणारी ठरल्याचंही ते म्हणाले.

राष्ट्रवादीने 54 तर काँग्रेसनेही फिफ्टी मारत 52 जागांवर विजय संपादीत केला. . मात्र, शिवस्वराज्य यात्रेचे स्टारप्रचारक डॉ. अमोल कोल्हे विजयाच्या सेलिब्रेशनमध्ये कुठेच दिसले नाहीत. आता, अमोल कोल्हेंनी विजयावर सविस्तर प्रतिक्रिया देताना पवारांच्या साताऱ्यातील सभेचं कौतुक केलंय.

सोशल मीडियातून पवारांच्या साताऱ्यातील सभेचे फोटो व्हायरल झाले होते. माझ्याकडेही एक फोटो आला होता, त्यावर लिहिलेलं वाक्य आमच्यासह सर्वांनाच प्रेरणा देणार आहे. संघर्षाची परिसीमा गाठली असेल आणि आपण हरतोय की काय? असे वाटत असेल तेव्हा माझ्यासमोर एक चित्र असेल ते म्हणजे पवारसाहेबांचा साताऱ्यातील सभेचा फोटो… असे अमोल कोल्हेंनी म्हटलंय. मला काही लोकांच्या प्रतिक्रिया आल्या, त्यामध्ये राजकारणापासून अनभिज्ञ असलेल्या लोकांनीही पवारांचा फोटो पाहून मी आता राजकारण पाहतोय, असं कोल्हे म्हणाले .

दरम्यान सातारा जिंकण्यासाठी शरद पवारांनी शेवटच्या टप्प्यात साताऱ्यात जंगी सभा घेतली. विशेष म्हणजे पवार भाषणासाठी उभे राहताच पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे पवारांच्या भाषणावर पाणी पडणार, असे सर्वांना वाटत होते. मात्र पवारांनी पावसाची पर्वा केली नाही. भरपावसात त्यांनी फटकेबाजी सुरू केली. उदयनराजेंना लोकसभा निवडणुकीत उमेदवारी दिली ही माझी चूक होती, असे सांगतानाच ही चूक सुधारण्यासाठी सगळेच सातारकर २१ तारखेची वाट पाहात आहेत, असे पवार म्हणाले. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला साक्षात वरुणराजाने आशीर्वाद दिले आहेत आणि त्या आशीर्वादाच्या बळावर सातारा जिल्हा महाराष्ट्रात चमत्कार करणार आहे, असा विश्वासही पवारांनी व्यक्त केला होता .