सामान्य नागरिकांना लाभ देण्यासाठी समर्पित भावनेने काम करा – पालकमंत्री जयकुमार रावल – महासंवाद

सामान्य नागरिकांना लाभ देण्यासाठी समर्पित भावनेने काम करा – पालकमंत्री जयकुमार रावल – महासंवाद
- Advertisement -

सामान्य नागरिकांना लाभ देण्यासाठी समर्पित भावनेने काम करा – पालकमंत्री जयकुमार रावल – महासंवाद

धुळे, दि. ७ (जिमाका): शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समर्पित भावनेने काम करावे, असे आवाहन पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी कामपूर येथे केले.

शिंदखेडा तालुक्यातील कामपूर येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान कार्यक्रमात ते बोलत होते. या शिबिरास कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नारायण पाटील, सरपंच माधुरी पाटील, उपविभागीय अधिकारी (शिरपूर) शरद मंडलीक, तहसीलदार नितीन देवरे, गटविकास अधिकारी रमेश नेतनराव, तालुका कृषी अधिकारी मनोज सिसोदे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री रावल म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियानाच्या माध्यमातून जनतेला “रयतेचे राज्य”ही संकल्पना प्रत्यक्षात अनुभवता यावी, या उद्देशाने राज्यभरात अशा शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. या शिबिरांच्या माध्यमातून विविध विभागांच्या योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

या शिबिरात विविध विभागांचे स्टॉल उभारण्यात आले होते. संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत सुमारे ११८ लाभार्थ्यांना मंजुरी आदेश देण्यात आले. तसेच शिधापत्रिका, डिजिटल सातबारा उतारा, उत्पन्न, रहिवासी व जातीचा दाखला, ई-केवायसी आदी सुविधा महसूल विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात आल्या. याठिकाणी उपस्थित महिलांची आरोग्य तपासणी करण्याबरोबरच महिला व बाल विकास विभागामार्फत पोषण आहाराबाबत माहिती देण्यात यावी, तसेच शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

गतकाळात शासनामार्फत मतदारसंघात सुमारे दहा हजार विहिरी देण्यात आल्या असून बुराई, अमरावती व सुलवाडे-जामफळ यांसारखे प्रकल्प येत्या काळात पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. दोंडाईचा ते सोनगीर यामार्गाचे चौपदरीकरण सुरू असून कायमस्वरूपी रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. सिंचन व पाण्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील असून सामान्य नागरिकांची सेवा करण्याच्या समर्पित भावनेने सर्वांनी काम करावे. असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी पालकमंत्री रावल यांच्या हस्ते 457 विविध लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ वितरित करण्यात आले. कार्यक्रमास शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००

- Advertisement -