Home शैक्षणिक ‘सीईटी’ने सुरू केलेलं पोर्टलचं सर्व्हर झालं डाऊन

‘सीईटी’ने सुरू केलेलं पोर्टलचं सर्व्हर झालं डाऊन

सोलापूर : अभियांत्रिकी, औषधनिर्माण, आर्किटेक्चर या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची प्रक्रिया सुरू आहे. सध्या कागदपत्रे तपासणीचा टप्पा सुरू आहे. मात्र, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे सुरू करण्यात आलेल्या पोर्टलचा सर्व्हर डाऊन असल्यामुळे तीन दिवसांपासून विद्यार्थी-पालकांचे हाल होत आहेत. काही विद्यार्थी व पालक हे सलग तीन दिवस येऊनही कागदपत्रांची तपासणी न झाल्याने वैतागले आहेत.

विद्यार्थी व पालकांची गैरसोय टाळण्यासाठी महाविद्यालयातर्फे टोकन पद्धत सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालक यांना होणारा त्रास काही प्रमाणात कमी झाला आहे. विद्यार्थ्यांची कागदपत्रे तपासल्यानंतर त्यांची स्कॅन केलेली प्रत संके तस्थळावर अपलोड करायचे आहे. तसेच विद्यार्थ्यांची माहिती संकेतस्थळावर भरायची आहे. हे करत असताना सर्व्हरकडून प्रतिसाद मिळत नसल्याने या प्रक्रियेस उशीर होत आहे. 

आतापर्यंत सार पोर्टलवर दोन लाख ६३ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यंदा प्रथमच ही प्रक्रिया आॅनलाईन पद्धतीने होत आहे. तसेच एकाचवेळी अनेक विद्यार्थी प्रवेश प्र्रक्रि येत सहभागी होत असल्याने तांत्रिक अडचणी येत आहेत. शहरामधील महाविद्यालयातप्रवेशासाठी आलेल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरातील विद्यार्थ्यांच्या तुलनेने जास्त त्रास होत आहे. एकाच दिवशी आपले काम आटोपून घरी जाण्याची धडपड करणाºया विद्यार्थ्यांना पुन्हा दुसºया दिवशी यावे लागत आहे. 

शासनातर्फे एका महाविद्यालयाला १० लॉग इन देण्यात आले आहेत. या लॉग इनची संख्या मर्यादित असल्याने एकावेळी १० विद्यार्थ्यांचे काम होऊ शकते. हे टाळण्यासाठी काही महाविद्यालयाकडून लॉग इन वाढवून मिळण्याची विनंतीही करण्यात आली आहे.

दरम्यान सेतू कार्यालयाच्या रांगेत विद्यार्थी व पालक तासन्तास उभे राहत असल्याचे चित्र जिल्हाधिकारी कार्यालयात दिसून येत आहे. एकाच वेळी दाखल्यांसाठी गर्दी वाढल्याने प्रशासनाचीही चांगलीच दमछाक होत आहे. बारावी परीक्षेचा निकाल काही दिवसांपूर्वीच लागला आहे. निकालानंतर बारावीनंतर उच्च शिक्षण देणाºया विविध संस्थेत प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. उच्च शिक्षण घेणाºया मागासवर्गीय, आर्थिक मागास यासारख्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कात सूट देण्यात येते. मात्र, यासाठी आवश्यक कागदपत्रे प्रवेश अर्ज भरतानाच विद्यार्थ्यांनी सादर करणे आवश्यक असल्याने हे दाखले मिळविण्यासाठी पालकांसह विद्यार्थ्यांची एकच धांदल उडत आहे. 

उत्पन्न दाखला घेण्यासाठी तलाठी यांच्याकडील उत्पन्नाची शिफारस पालकांना घ्यावी लागते. त्यानंतर स्वयंघोषणापत्र सादर करून तहसीलदार यांच्याकडे उत्पन्न दाखल्यासाठी रितसर सेतू कार्यालयामार्फत अर्ज सादर करावा लागतो. जातीच्या दाखल्यासाठी ५० वर्षांपूर्वीचा जातीचा उल्लेख असलेला दाखला मिळवून तो सादर करतानाही पालकांची चांगलीच दमछाक होत आहे. उन्नत गटात मोडत नसल्याच्या प्रमाणपत्रासाठी मागील तीन वर्षांखालील उत्पन्नाचा स्रोत पालकांना सादर करावा लागत आहे. 

उच्च शिक्षण घेण्यासाठी एकाच वेळी उत्पन्न, जात, अधिवास, नॉन क्रिमिलीअर यासारखे दाखले सादर करावे लागतात. हे दाखले मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करताना पालकांना प्रचंड धावपळ करावी लागत आहे. दाखल्यांसाठी अर्ज करणे, प्रतिज्ञापत्र सादर करणे, अपूर्ण असलेल्या कागदपत्रांची पूर्तता करून पुन्हा दाखला मिळविण्यासाठी प्रतीक्षा करण्याचा प्रसंग अनेक पालकांवर येत आहे. 

पडताळणीची प्रक्रिया सोमवारपासून होणार सुरु 
– राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे कागदपत्रे तपासणीसाठी प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. ही प्रक्रिया पुुन्हा सोमवार (ता.२४) पासून सुरु  करण्याचा निर्णय प्रवेश नियामक प्राधीकरणाने घेतला आहे. याबाबतचे सुधारित वेळापत्रक राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आधीच प्रवेश प्रक्रियासाठी अर्ज केला आहे, अशांना पु्न्हा एकदा अर्ज सादर करावा लागणार आहे. 

मी मागील तीन दिवसांपासून महाविद्यालयाच्या सेतू केंद्रात कागदपत्रे तपासणीसाठी येत आहे. सर्व्हर कधी सुरू तर कधी बंद असते. आमच्यासोबत आमच्या पालकांचाही यामुळे वेळ वाया जात आहे. यावर लवकर तोडगा काढावा.
 – हर्षल शिंदे, विद्यार्थी

माझ्या पाल्याच्या कागदपत्र तपासणीची प्रक्रि या पूर्ण झाली आहे. फक्त पोचपावती मिळणे शिल्लक राहिले आहे. दोन दिवस यासाठी खर्ची घातले, पण हे काम पूर्ण होत नाही. त्रास कमी करण्यासाठी तांत्रिक अडचण दूर करावी.
 – मेहमूद शेख, पालक

उच्चशिक्षित पालकही एजंटाच्या दारात..
– सेतू कार्यालयात मिळणाºया दाखल्यांसाठी आॅनलाईन प्रणाली सुरू करण्यात आली आहे. दाखल्यांसाठी काय कागदपत्रे आवश्यक आहेत, त्यासाठी अर्ज कसा व कोणत्या खिडकीत सादर करावा याची संपूर्ण माहिती सेतू कार्यालयातील फलकांवर दर्शविण्यात आली आहे. मात्र, तरीही उच्च शिक्षित असलेले पालकही सेतू कार्यालयातील दाखले मिळविण्यासाठी सेतू कार्यालयाच्या बाहेर असलेल्या एजंटाच्या दारात उभे राहिलेले दिसून येत आहेत. 

मुलांच्या दाखल्यांसाठी पालकांनी काढली रजा
– दाखले मिळविताना अनेक अडचणी समोर येत आहेत. त्यामुळे मुलांच्या प्रवेशाकरिता सर्व दाखले मिळविण्यासाठी चार दिवसांची रजाच घेतली असल्याची प्रतिक्रिया एका खासगी कंपनीत काम करणारे जयेश रूपनवर यांनी दिली.