
सातारा दि.12-महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त कराड येथील प्रिती संगमावरील समाधीस्थळावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, आमदार सर्वश्री अतुल भोसले, मनोज घोरपडे, सचिन पाटील, माजी आमदार बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराज आदी उपस्थित होते.
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा आदर्श घेऊन सर्वसामान्यांना न्याय देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांनी घालून दिलेल्या आदर्श विचारांवरच राज्य शासन काम करीत आहे. त्यांच्या विचारांच्या माध्यमातूनच सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम शासन करीत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व समाजाला घेऊन स्वराज्याची स्थापना केली. त्यांनी समाजामध्ये समतेचा भाव निर्माण केला. त्यांचा आदर्श आजच्या नव्या पिढीने घ्यावा असे आवाहनही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी केले.
कोयना धरण प्रकल्पग्रस्तांचे काही प्रश्न प्रलंबित आहेत हे प्रश्न सोडवण्यासाठी लवकरच बैठक लावून प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या स्मारकासाठीही प्रयत्न केले जातील असेही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी यावेळी सांगितले.
0000