Home शहरे जळगाव व्याघ्रसंवर्धन जागृतीसाठी मोटारसायकल रॅली

व्याघ्रसंवर्धन जागृतीसाठी मोटारसायकल रॅली

जळगाव : सातपुड्यातील वाघ आणि वन्यजीव वाचवावे या उद्देशाने वन्यजीव संरक्षण संस्था गेल्या बारा वर्षांपासून प्रयत्नशील असून, उत्तर महाराष्ट्रात फक्त जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक पट्टेदार वाघ आहेत. त्यांच्या संवर्धनासाठी संस्थेने पुढाकार घेत जागतिक व्याघ्र दिनाच्या निमित्त रविवारी (दि. २८) मोटारसायकल रॅली काढली. यामध्ये जळगाव आणि यावल वन विभागाच्या आणि जिल्ह्यातील पर्यावरणवादी संस्थांच्या सहकार्याने व्याघ्रसंवर्धन जनजागृती मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. 
शहरातून रविवारी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे, अप्पर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते रॅलीस हिरवी झेंडी दाखवण्यात आली. या वेळी उपवनसंरक्षक दिगंबर पगार, उपवनसंरक्षक मोरणकर, टायगर कॉन्झर्वेशन अँड रिसर्च सेंटर मुंबईचे अध्यक्ष प्रसाद हिरे, मेळघाटचे रवींद्र मोहोड, केशव स्मृतीचे भरत अमळकर, पोलिस निरीक्षक पुरडकर, पर्यावरण शाळेचे राजेंद्र नन्नवरे, अभय उजागरे, दीपक परदेशी उपस्थित होते. शहरातून स्टेडियम कॉम्प्लेक्स, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, स्टेशन रोड, टॉवर चौक या भागात मानवी वाघांचा सहभाग असलेले पथनाट्य सादरीकरण करीत सदर रॅली काढण्यात आली. येत्या दोन दिवसांत नशिराबाद, भुसावल, वेल्हाळे, वरणगाव, मुक्ताईनगर, डोलारखेडा, चारठाणा, रावेर, खिरोदा, पाल आणि त्या परिसरातील मिळून अशा २५ गावांत पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे. रॅली संयोजक म्हणून बाळकृष्ण देवरे हे आहेत. तर निमंत्रक म्हणून अध्यक्ष रवींद्र फालक, उपाध्यक्ष विजय रायपुरे, योगेश गालफडे आदींनी नियोजनाची जबाबदारी स्वीकारली आहे. जळगाव जनता बँक आणि केशवस्मृती प्रतिष्ठान आणि भुसावळ येथील युरोकिड्स गुरुकुलने सहकार्य केले आहे. या वेळी दीपक परदेशी, अरविंद देशमुख यांचा सत्कार करण्यात आला.