Home शहरे अकोला नाटकांमध्ये समाजात बदल घडविण्याची ताकद – महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

नाटकांमध्ये समाजात बदल घडविण्याची ताकद – महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

0
नाटकांमध्ये समाजात बदल घडविण्याची ताकद – महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

मुंबई, दि. 21 : कलेच्या माध्यमातून सामाजिक भावना समाजापुढे मांडण्याची परंपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे. नाट्य स्पर्धेतून अनेक दिग्गज कलाकार रंगभूमीला मिळाले आहे. समाजामध्ये बदल घडविण्याची ताकद नाटकांमध्ये आहे, असे प्रतिपादन महसूलमंत्री श्री.बाळासाहेब थोरात यांनी केले.

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत घेण्यात येणाऱ्या हीरक महोत्सवी राज्य नाट्य स्पर्धेचे राज्यस्तरीय उद्घाटन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

या उद्घाटन कार्यक्रमास सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील,  सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर (दूरदृश्यप्रणालीद्वारे), सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे आणि १९ जिल्ह्यांमधील मान्यवर उपस्थित होते.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, कोरोना महामारीमुळे अनेक क्षेत्रांवर कठीण परिस्थिती ओढावली होती. त्यानंतर नाट्यस्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करुन आनंद महोत्सव साजरा करीत आहोत. माझ्यासह अनेक सहकारी नाट्यप्रेमी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेही कला आणि कलावंतांशी जिव्हाळाचे नाते आहे. नाट्यकलेच्या माध्यमातून संस्कृती जतन करण्यासाठी राज्यातील प्रत्येक सहकारी गृहनिर्माण संस्था, साखर कारखाने, बँका, दूधसंघामध्ये एक नाट्य प्रयोग झाल्यास कलावंतांना त्यांच्या कलेचे सादरीकरण करण्यासाठी आणि समाजप्रबोधन करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ मिळेल.

पुढच्या वर्षी स्पर्धा नव्हे तर ‘नाट्य महोत्सव’ व्हावा

कलाकारांच्या प्रयत्नांना दाद दिली पाहिजे यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात पुढाकार घ्यावा. यावर्षी ही नाट्य स्पर्धा आहे मात्र पुढच्या वर्षी हा महोत्सव व्हावा. नाटककारांनी नेहमी अन्यायावर प्रहार केला. त्याचबरोबर सामाजिक प्रबोधनातून समाज घडविण्याचा प्रयत्न केला. नाटकांच्या माध्यमातून सामाजिक भावना समाजापुढे मांडण्याची महाराष्ट्राला परंपरा लाभलेली आहे. नाट्य स्पर्धेच्या माध्यमातून अनेक दिग्गज कलाकार रंगभूमीला मिळाले. महाराष्ट्र संत, विचारवंत आणि समाजसुधारक भूमी आहे त्यांचे विचार नाट्यकृतींच्या माध्यमातून समाजात खोलवर रुजले आहेत. कोरोना महामारीमुळे अनेक क्षेत्रांवर कठीण परिस्थिती ओढावली असली तरी त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी राज्य शासन नक्कीच मदत करेल. तसेच वाद्यसंस्कृती जपण्याची गरज असून वाद्य तयार करणाऱ्यांना उभे करण्यासाठी व वाद्यसंस्कृती जपण्यासाठी शासन त्यांच्याही पाठीशी राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

राज्य नाट्य स्पर्धा समाजातील विचार मांडणारे व्यासपीठ – सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख म्हणाले, गेली सहा दशके राज्य नाट्य स्पर्धा महाराष्ट्रात सुरू आहे. इतका काळ अविरतपणे सुरू असलेली आणि नाट्यकलावंतांना ऊर्जा देणारी ही भारतातील एकमेव स्पर्धा असावी. कोविडच्या संसर्गामुळे गेल्या वर्षी ही स्पर्धा होऊ शकली नव्हती. यंदाही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे ही स्पर्धा पुढे ढकलावी लागली. आता कोरोना साथ काही प्रमाणात नियंत्रणात आली असली, तरी अंतरनियमनासारखी काही पथ्ये आपल्याला पाळायची आहेत. याचे भान ठेवूनच ही हीरक महोत्सवी राज्य नाट्य स्पर्धा आयोजित केली आहे. निर्बंधाखाली का होईना, ही स्पर्धा यंदा होत आहे याचा मनस्वी आनंद आहे.

श्री.देशमुख म्हणाले, समाजात काय घुसळण सुरू आहे, कोणत्या प्रकारचे विचारमंथन घडते आहे याचे दर्शन राज्य नाट्य स्पर्धा घडवत असते. समाजात जे सुरू आहे ते या स्पर्धेच्या माध्यमातून व्यासपीठावर सादर होत असते. या स्पर्धेत सादर होणाऱ्या नाटकांची शीर्षके जरी पाहिली तरी हे स्पष्ट होईल. शेकडो हौशी नाट्यसंघ, अनेक कलाकार, लेखक या राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी होत आहेत. या स्पर्धेतून पुढे येणाऱ्या गुणवंत कलाकारांसाठी दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या माध्यमातून कार्यशाळेचे आयोजन करण्याचे ठरवले आहे. कलाकारांमध्ये व्यावसायिकता यावी, यादृष्टीने अशा कार्यशाळेचा निश्चितच उपयोग होईल असा विश्वास आहे. राज्य शासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नाट्य-कला क्षेत्रासाठी अनेक पातळ्यांवर कार्यरत आहे. येत्या काळात सिनेमा-नाटक-मनोरंजन क्षेत्राला उद्योगाचा दर्जा मिळावा, यासाठी प्रयत्नशील आहोत. या क्षेत्रास उद्योगाचा दर्जा मिळाल्यास नाट्यकलावंताना शासनाकडून आवश्यक असणारे पाठबळ वाढेल, अशी आशा आहे. ही राज्य नाट्य स्पर्धा नाट्यरसिकांसाठी मेजवानी ठरणार आहे. त्यांनी या स्पर्धेचा आनंद घ्यावा, असे आवाहन श्री.देशमुख यांनी यावेळी केले.

सहकार मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, गेल्या साठ वर्षांत नाट्य-कलेच्या क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देणारे कलाकार राज्य नाट्य स्पर्धेच्या माध्यमातून पुढे आले आहेत. अशी ही महत्त्वाची स्पर्धा गेल्या वर्षी कोरोनामुळे होऊ शकली नव्हती. खरे तर कोरोना संसर्गामुळे गेली दोन वर्षे आपण एकप्रकारे कोंडून बसलो होतो. परंतु यंदा ही स्पर्धा होत आहे याचा आनंद आहे. स्पर्धेत सादर होणाऱ्या नाटकांचा आस्वाद नाट्यरसिक मनमुरादपणे घेतील असा विश्वास श्री.पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले, नाट्यकलेचा प्रसार व्हावा या हेतूने राज्य नाट्य स्पर्धेचा प्रारंभ झाला. गेल्या साठ वर्षांत या स्पर्धेच्या माध्यमातून तो हेतू प्रभावीपणे साध्य झाला आहे. कलाकारांसाठी महाराष्ट्र शासन निरनिराळे उपक्रम राबवत आहे. नाट्यप्रयोगांना अनुदान, नाट्य प्रशिक्षण शिबिर, वृद्ध कलावंतांना मानधन अशा विविध योजना सांस्कृतिक कार्य विभागामार्फत राबविल्या जात आहेत. राज्य नाट्य स्पर्धा तर उदयोन्मुख कलाकारांसाठी मोठी संधी असते. या कलाकारांना नाट्यरसिकांनीही प्रोत्साहन द्यावे आणि या स्पर्धेचा आनंद घ्यावा, असे आवाहन श्री. यड्रावकर यांनी केले.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी राज्य नाट्य स्पर्धा घेता आली नव्हती. यंदाचे वर्ष हे स्पर्धेचे हीरक महोत्सवी वर्ष असल्याने व ‘आजादी का अमृत महोत्सव’ या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा होत आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत घेण्यात येणाऱ्या या स्पर्धा हौशी मराठी, बाल, हिंदी, संगीत, संस्कृत, दिव्यांग, बाल नाट्य अशा सहा विविध प्रकारांमधून राज्यातील ३४ केंद्रांवर घेण्यात येणार आहेत.

जवळपास तीन महिने अविरत चालणाऱ्या या स्पर्धांमधून एकूण ९५० संघ/संस्था भाग घेणार आहेत अशी माहिती यावेळी देण्यात आली.

0000