बुलडाणा, (जिमाका) दि. 28 : वापरलेल्या वीज देयकाचे पैसे न भरल्याने महावितरण आर्थिक संकटात आहे. त्यामुळे प्रत्येक वीज ग्राहकाने आपल्याकडील देयकाची थकबाकी असल्यास ती भरावी. देयकाची थकबाकी भरल्यास महावितरण आर्थिकदृष्ट्या संपन्न होईल.तरी वीज देयकांची थकबाकी भरून महातिवरणला सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे ऊर्जामंत्री ना डॉ. नितीन राऊत यांनी आज विद्युत भवन, खामगांव येथे आयोजित कार्यक्रमात केले.
महापारेषणच्या 220 के.व्ही. धरणगाव ता. मलकापूर वीज उपकेंद्राचे लोकार्पण आणि महावितरणच्या ३३/११ के. व्ही मनसगाव ता. शेगांव येथील वीज उपकेंद्राचे भूमिपूजन ना डॉ. राऊत यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्ष मनीषा पवार, आमदार राजेश एकडे, माजी आमदार दिलीप सानंदा, राहुल बोंद्रे, महावितरणचे मुख्य अभियंता अनिल डोये, महापारेषणचे मुख्य अभियंता भीमराव राऊत, महावितरणचे अधिक्षक अभियंता श्री. आकोडे आदी उपस्थित होते.
बोलताना ते पुढे म्हणाले, महावितरणला देखील बाहेरून पैसे देऊन वीज खरेदी करावी लागते. त्यामुळे प्रत्येक वीज ग्राहकाने देयकाची अदायगी करून सहकार्य करावे. महापारेषण व महावितरणचे नवीन वीज उपकेंद्र झाल्याने जिल्ह्यातील सुमारे पाच हजार वीज ग्राहकांना लाभ होणार आहे. शेतकरी बांधवांना दर्जेदार आणि खात्रीशीर वीज पुरवठा यामुळे मिळणार आहे. या वीज उपकेंद्राच्या उभारणीवर 144 कोटी रुपये खर्च झाले आहे, यात 1 हजार एमव्हीए क्षमतेचे दोन रोहित्र लावले आहे. यावेळी महापारेषण, महावितरणचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.