Home शहरे अकोला जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी आधुनिक शेती तंत्रज्ञानाकडे वळावे- पालकमंत्री धनंजय मुंडे – महासंवाद

जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी आधुनिक शेती तंत्रज्ञानाकडे वळावे- पालकमंत्री धनंजय मुंडे – महासंवाद

0
जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी आधुनिक शेती तंत्रज्ञानाकडे वळावे- पालकमंत्री धनंजय मुंडे – महासंवाद

      बीड, दि. 12 (जि. मा. का.) : जागतिक स्पर्धेत टिकायचे असेल तर शेतकऱ्यांनी परंपरागत शेती पद्धती बदलल्या पाहिजेत व आधुनिक शेती तंत्रज्ञानाकडे वळले पाहिजे. शेतकऱ्यांची गतप्रतिष्ठा परत मिळाली तरच शेतकरी समृद्ध होईल व खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचा सन्मान होईल. प्रगतशील शेतकऱ्यांनी इतरांनाही प्रेरणा देत, आपले कार्य, कर्तृत्त्व आणि धमक यातून बीड जिल्ह्याचे मागासलेपण दूर करावे व जिल्ह्याची नवी ओळख निर्माण करावी, असे आवाहन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आज येथे केले.

          राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा, विकेल ते पिकेल या कार्यक्रमांतर्गत स्टॉलचे उद्‌घाटन, अवजारे बँकचे लोकार्पण व विविध यांत्रिकीकरण घटकांतर्गत अवजारे वाटप अशा संयुक्त कार्यक्रमाच्या उद्‌घाटनानंतर आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

          जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात आयोजित या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्षा शिवकन्या शिरसाठ, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार संजय दौंड, जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, विभागीय कृषि सहसंचालक डॉ. डी. एल. जाधव, जिल्हा अधीक्षक जिल्हा  कृषि अधिकारी बी. के. जेजूरकर, जिल्हा परिषद कृषि विकास अधिकारी सुभाष साळवे, भारतीय कृ‍षि विमा कंपनीच्या विभागीय व्यवस्थापक श्रीमती शेट्टी आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

          या कार्यशाळेच्या माध्यमातून काही अंशी शेतकऱ्यांसमवेत वेळ व्यतित करता आल्याबद्दल समाधान व्यक्त करून पालकमंत्री धनंजय मुंडे म्हणाले, मोकळ्या आकाशाखाली शेतकरी व्यवसाय मांडत असतो. त्यामुळे नैसर्गिक संकटाला शेतकऱ्यांनाच सर्वात आधी सामोरे जावे लागते. मात्र अशा परिस्थितीत राज्य शासन त्यांच्या पाठिशी ठामपणे उभे आहे. जिल्ह्यातील 8 लाख शेतकऱ्यांना 302 कोटी रुपये पीक विम्याच्या रुपाने मिळाले. मिड ॲडव्हर्सिटीमध्ये 150 कोटी रुपये तर अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानासाठी भरपाई म्हणून बाराशे कोटी रुपये मिळाले आहेत. राज्य शासनाने दहा हजार रुपयांचे पॅकेज जाहीर केले. त्यामध्ये राज्यात सर्वाधिक पावणे सातशे कोटी रुपयांचा निधी एकट्या बीड जिल्ह्याला मिळाला आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. शेतकऱ्यांना शासन मदत करत आहे. मात्र, शेतकऱ्यांनी वीजबिल भरून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन करून त्यांनी काही प्रमाणात वीज देयक अदा केले असेल, अशा शेतकऱ्यांची वीजजोडणी कापू नये, असे निर्देश त्यांनी यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले.

          इतर जिल्ह्यात ऊसतोड मजूर म्हणून काम करत आहात. पण मनगटाची ही ताकद आपल्या जिल्ह्यातील शेतात वापरली जाईल, तेव्हाच खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा सन्मान होईल, असे सांगून पालकमंत्री धनंजय मुंडे म्हणाले, शेती वापरात यंत्राचा उपयोग केल्याने वेळ वाचत असल्याची बाजू सकारात्मक असली तरी शेतमजुरांना काम मिळत नाही. याची सांगड घालणे गरजेचे आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांनी शेतमजुरांना रोजगार हमी योजनेतून कामे मिळतील, असा विश्वास दिला पाहिजे.

          जिल्ह्यात महावितरणने कृषिधोरण 2020 अंतर्गत चांगली कामगिरी केली असून मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात 73 कोटी रुपये कृषि वीजबिलांची वसुली करुन बीड जिल्हा प्रथम आला आहे. शेतकऱ्यांच्या या योगदानामुळे जवळपास 3 हजाराहून अधिक शेतकऱ्यांना 7 कोटी, 38 लाख रुपयांची वीजबिल माफी देखील देण्यात आली आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली.

          सदरची कार्यशाळा उद्घाटनपर व तांत्रिक मार्गदर्शन अशा दोन सत्रात घेण्यात आली. उद्‌घाटनपर सत्रात पालकमंत्री धनंजय मुंडे व मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात पाच परवानाधारकांना ऑनलाईन बियाने परवाना वितरण करण्यात आले. तसेच, बीड जिल्ह्यातील नाविण्यपूर्ण उपक्रम राबविलेल्या प्रेरणादायी शेतकऱ्यांचा व उत्कृष्ट काम केलेले अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. नानासाहेब देशमुख कृषि संजीवनी योजनेंतर्गत घडीपत्रिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

           प्रारंभी राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांना मान्यवरांनी अभिवादन केले. बी. के. जेजूरकर यांनी कार्यक्रमाची रुपरेषा विषद केली. डॉ. डी. एल. जाधव यांनी स्वागत केले. आभार बीडचे उपविभागीय कृषि अधिकारी एन. आर. कोकाटे यांनी मानले. सूत्रसंचालन संतोष घसिंग यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन बीड जिल्हा अधीक्षक कार्यालय व तालुका कृषि कार्यालयाने केले.

पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते अवजारे बँकेचे लोकार्पण

          यावेळी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत विकेल ते पिकेल या अभियानांतर्गत शेतकऱ्यांच्या स्टॉलचे उद्घाटन, विविध योजनांतर्गत अवजारे वाटप व अवजारे बँक लोकार्पण करण्यात आले.

          तसेच, जिल्ह्यातील विविध लाभार्थी शेतकऱ्यांना वितरीत करण्यात येणारे ट्रॅक्टर्स, कृषिपूरक अवजारे, रोटाव्हेटर, ट्रिलर यासह विविध कृषि साहित्य यांचे वितरण करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात विकेल ते पिकेल या अभियानांतर्गत लावण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या स्टॉलवर मांडलेल्या उत्पादनांची पालकमंत्री व अन्य मान्यवरांनी यावेळी पाहणी करुन माहिती घेतली.

यावेळी कृषि विभागाच्या वतीने कृषि उत्पादनांची, शेतकरी बचत गटाच्या उत्पादनांची पालकमंत्री धनंजय मुंडे यांना माहिती देण्यात आली. यावेळी जिल्ह्यात रंगीत ढोबळी मिरची उत्पादन करुन त्याची महानगरांमध्ये पाठवणी करणारे आष्टी तालुक्यातील प्रगतशील शेतकरी कैलास आंधळे यांनी पालकमंत्र्यांना रंगीत ढोबळीला पुणे, मुंबई आदि मोठ्या शहरात अधिक मागणी असल्याने बीड येथून पाठवले जात असल्याचे सांगितले. यावेळी कृषि अवजारे बँकेसाठी वितरणाचे ट्रॅक्टर्स व विविध साहित्यांचे मोठ्या प्रमाणात प्रदर्शन करण्यात आले.