मुंबई, दि. 16 :- ज्येष्ठ नेते, माजी मंत्री शंकरराव कोल्हे साहेबांच्या निधनाने, महाराष्ट्राच्या राजकारण, समाजकारण, सहकार क्षेत्रातील जाणकार नेतृत्वं काळाच्या पडद्याआड गेले आहे. त्यांचे निधन ही महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्राची मोठी हानी आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, माजी मंत्री शंकरराव कोल्हे साहेबांनी नगर जिल्ह्याच्या, ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासात मोठं योगदान दिलं. राजकीय, सामाजिक, सहकारक्षेत्रात कर्तृत्वाचा ठसा उमटवला. शेतकऱ्यांच्या विकासासाठी त्यांनी दिलेलं योगदान कायम स्मरणात राहील. त्यांच्यासारख्या नेतृत्वाची उणीव कायम जाणवेल. शोकाकूल कोल्हे कुटुंबियांच्या, त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केली.
००००००