मुंबई: राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, कोकण, खान्देश आदी भागात अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे नागरिकांना इतरत्र हलविले जात आहे. या नागरिकांना सर्व स्तरातून मदतीचा ओघ सुरू आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकासमंत्री महादेव जानकर आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी दोन्ही महामंडळातर्फे प्रत्येकी 10 लाख अशी एकूण 20 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याची घोषणा केली आहे.
कोल्हापूर, सांगली, सातारा, कोकण आणि खान्देश येथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले जात असून मदत व पुनर्वसनाकरिता राज्य सरकार सर्वतोपरी कार्य करत आहे. पूरग्रस्त भागातील पशूंच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत पशुवैद्यकीय डॉक्टरांची पथके पाठविली असून आवश्यक औषधांचा पुरवठा करण्यात आला असल्याचेही श्री. जानकर यांनी सांगितले