Home शहरे अहमदनगर दहा कोटीच्या खंडणीसाठी शाळकरी विद्यार्थ्याचे अपहरण

दहा कोटीच्या खंडणीसाठी शाळकरी विद्यार्थ्याचे अपहरण

0

संगमनेर : दहा कोटीच्या खंडणीसाठी एका शाळकरी मुलाचे अपहरण करून त्याच्या वडिलांना फोन केला. संगमनेर येथील या शाळकरी मुलाचे वडील कापड व्यवसायिक आहेत. अपहरणकर्त्याचा माग पोलिसांनी काढल्याने खंडणीखोरांनी त्या मुलाला शहराजवळील खेड्यात सोडून दिले. पोलिसांनी या प्रकरणी या चौघांना अटक केली आहे.

बारा वर्षीय ध्रुव नावाचा हा मुलगा ग्लोबल स्कूलमध्ये शिकतो. त्याचे वडील मनोज कटारिया संगमनेर येथील कटारिया क्लॉथचे संचालक आहे. सकाळीच तो नेहमीप्रमाणे शाळेत जाण्यासाठी घराबाहेर पडला होता. घरापासून काही अंतरावर स्कूलबसची वाट पाहत असताना इंडिकामधून आलेल्या अपहरणकर्त्यांनी त्याला उचलून इंडिकामध्ये टाकले व तेथून पलायन केले. काही वेळानंतर अपहरणकर्त्यांनी मुलाच्या पालकांना फोन करत अपहरण केल्याचे सांगितले.

घाबरलेल्या पालकांननी शाळेत बसचालकाकडे चौकशी केली तेव्हा त्यांना कळले की त्यांचा मुलगा शाळेत आलाच नाही. दरम्यानच्या काळात अपहरणकर्त्यांनी एका मॅसेजच्या द्वारे त्यांच्याकडे दहा कोटीची मागणी केली. त्यांनी लगेच पोलिसांना ही माहिती दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तातडीने तपास सुरू केला. मिळालेली माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी शोध सुरू केला. पोलीस संशयितांपर्यंत पोहचल्याचा सुगावा लागल्याने आरोपींनी मुलाला संगमनेरनजीक सुकेवाडी येथे सोडून दिले.

एका तरुणाला हा मुलगा सुकेवाडी येथे आढळळ्यानंतर त्याने पोलिसांना याची माहिती दिली. पोलीस तातडीने तिथे पोहचले व त्यांनी मुलाला ताब्यात घेऊन कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली असून एक गावठी पिस्तूलही जप्त केले आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक इशू सिंधू यांनी दिली