Home ताज्या बातम्या ‘युवा संगम’ कार्यक्रमासाठी ९ एप्रिलपर्यंत नोंदणीची मुदत

‘युवा संगम’ कार्यक्रमासाठी ९ एप्रिलपर्यंत नोंदणीची मुदत

0
‘युवा संगम’ कार्यक्रमासाठी ९ एप्रिलपर्यंत नोंदणीची मुदत

मुंबई, दि. ६ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘एक भारत- श्रेष्ठ भारत’ अंतर्गत ‘युवा संगम’ कार्यक्रम सुरू झाला आहे. यानिमित्त भारतीय प्रौद्योगिकी संस्थान, मुंबई (आयआयटी, मुंबई) येथे पुढील महिन्यात कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. या कार्यक्रमात पंजाबमधील ४५ तरुण सहभागी होतील. तसेच महाराष्ट्रातील ३५ तरुण, दादरा- नगर हवेली, दमण-दीव येथील १० तरुण एनआयटी, जालंधर येथील कार्यक्रमात सहभागी होतील. त्यासाठी १८ ते ३० वर्षे वयोगटातील तरुणांनी ९ एप्रिल २०२३ पर्यंत  https://ebsb.aicte-india.org या पोर्टलवर नोंदणी करावी, असे आयआयटी, मुंबईचे निदेशक प्रा. शुभाशिस चौधुरी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमधील तरुणांमध्ये संवाद व्हावा म्हणून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या कार्यक्रमात २३ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील एक हजार तरुणांचा सहभाग अपेक्षित आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून पर्यटन, परंपरा, प्रगती, व्यावसायिक, तंत्रज्ञान आणि परस्पर संपर्कावर भर देण्यात येणार आहे. त्यानुसार आयआयटी मुंबई येथे पुढील महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पंजाबमधील ४५ तरुण सहभागी होतील. याशिवाय महाराष्ट्रातील ३५, दादरा- नगर- हवेली, दमण- दीव येथील दहा तरुण एनआयटी जालंधर येथे जातील. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी राज्य सरकारचे सहकार्य लाभत असल्याचे निदेशक प्रा. चौधुरी यांनी म्हटले आहे.

०००००

गोपाळ साळुंखे/स.सं