Home ताज्या बातम्या विविध योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांची गैरसोय होणार नाही याकडे अधिकारी वर्गांनी लक्ष दिले पाहिजे – पालकमंत्री रविंद्र चव्हाण

विविध योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांची गैरसोय होणार नाही याकडे अधिकारी वर्गांनी लक्ष दिले पाहिजे – पालकमंत्री रविंद्र चव्हाण

0
विविध योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांची गैरसोय होणार नाही याकडे अधिकारी वर्गांनी लक्ष दिले पाहिजे – पालकमंत्री रविंद्र चव्हाण

पालघर दि. 13 : ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमासाठी जे लाभार्थी उपस्थित राहू इच्छित आहेत अशा लाभार्थ्यांना कार्यक्रम स्थळापर्यंत येण्यासाठी व मुख्य कार्यक्रमामध्ये कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याकडे अधिकारी वर्गांनी लक्ष दिले पाहिजे असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी केले.

15 जून रोजी ‘शासन आपल्या दारी’ पालघर जिल्ह्याच्या कार्यक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सकाळी  11 वाजता सिडको मैदान, पालघर-बोईसर रोड, कोळगाव, पालघर येथे होणार आहे. ‘शासन आपल्या दारी’ शुभारंभ कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी घेतला त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम, आमदार श्रीनिवास वनगा, रविंद्र फाटक,  जिल्हाधिकारी गोंविदं बोडके, पोलीस अधिक्षक बाळासाहेब  पाटील, वसई – विरार महानगरपालिकेचे आयुक्त अनिल पवार, सहायक जिल्हाधिकारी आयुषी सिंह, संगिता महापात्रा, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन, उपजिल्हाधिकारी (सा.प्र) संजीव जाधवर, जिल्हा नियोजन अधिकारी प्रशांत भामरे, जिल्हा परीषदेच्या माजी अध्यक्षा वैदेही वाढाण, डहाणू नगर परिषदेचे नगराध्यक्ष भरत राजपूत आदि मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री यांनी केली कार्यक्रम स्थळाची पाहणी

आढावा बैठकीच्या अगोदर पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी कार्यक्रम स्थळाला भेट देऊन कार्यक्रमासाठी करण्यात आलेल्या कामाची पाहणी केली. जिल्ह्यातील विविध भागातून येणाऱ्या लाभार्थ्यांना पिण्याचे पाणी व खाद्यपदार्थ यांची मुबलक उपलब्धता करुन  ठेवण्याबाबत पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले.