राज्यातील नवीन साकवांसाठी १३०० कोटींचा आराखडा – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण
मुंबई, दि. 28 : राज्यातील डोंगरी तालुके, कोकण आणि आदिवासी भागातील सर्व रस्ते बारमाही वाहतुकीसाठी जोडण्यासाठी नवीन साकव व्हावेत अशी अनेक ठिकाणांवरून मागणी आहे. यासाठी सुमारे १३०० कोटींचा आराखडा तयार करण्यात येत आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधानसभेत दिली.
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील शिंदी ते आरव येथील लोखंडी पूल दुरुस्ती दरम्यान झालेल्या अपघाताबाबत विधानसभा सदस्य रईस शेख यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता.
मंत्री श्री.चव्हाण म्हणाले की, महाबळेश्वर तालुक्यातील शिंदी ते आरव दरम्यानच्या तुटलेल्या पुलाच्या कामाची निविदा मंजूर करण्यात आली असून ते काम पुढील पावसाळ्यापूर्वी पूर्ण केलं जाईल. या आराखड्यातून ओढे, नाले यावरील छोटे पूल पक्क्या स्वरूपात बांधले जातील आणि अशा साकवांसाठी एक कोटीपर्यंतचा निधी उपलब्ध करून दिला जाईल.
यावेळी सदस्य सर्वश्री रवी पाटील, योगेश कदम, संग्राम थोपटे, प्रकाश आबिटकर यांनी सहभाग घेतला.
००००