खरवली येथील नारायण धुमाळ यांच्या दोन गुरांचा वादळाने पडलेल्या विद्युत वाहक तारांमुळे मृत्यू – शेतकऱ्याला मदतीची गरज

- Advertisement -

बोरघर / माणगांव : ( विश्वास गायकवाड ) माणगांव तालुक्यातील खरवली येथील शेतकरी नारायण धोंडू धुमाळ यांनी सोमवार दिनांक १४ ऑक्टोबर रोजी सकाळी सात वाजता नेहमी प्रमाणे चरायला सोडलेल्या गुरांपैकी एक बैल आणि एक गाभण गाय मोकळ्या जागेत चरत असताना त्यांना वादळाने जमिनीवर पडलेल्या विद्युत वाहक तारांचा स्पर्श होवून त्यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे…. रविवार दिनांक १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी खरवली विभागात वादळीवाऱ्यासह पडलेल्या तुफान परतीच्या पावसामुळे खरवली प्राथमिक आरोग्य सब सेंटर च्या समोरील मोकळ्या गवताळ जागेत चालू विद्युत वाहक तारा तुटून जमिनीवर पडल्या होत्या. सदर पडलेल्या विद्युत वाहक तारांच्या सान्निध्यात खरवली चे शेतकरी नारायण धोंडू धुमाळ यांची दोन गुरे ( एक बैल आणि एक गाभण गाय ) आल्याने त्यांना चालू अवस्थेत पडलेल्या विद्युत वाहक तारांचा स्पर्श झाल्याने त्या दोन्ही गुरांना शाॅक लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि शेतकरी यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून सदर दुर्दैवी घटनेचा पंचनामा केला. गरीब शेतकरी नारायण धोंडू धुमाळ यांच्या शेतीच्या कामाचा बैल आणि गाभण गाय या प्रसंगात दगावल्याने त्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांना या संकटातून बाहेर येण्यासाठी शासनाच्या आर्थिक मदतीची खूप गरज आहे.

- Advertisement -