ऑक्टोबरमध्ये रेल्वे पुलाच्या कामाला सुरुवात; स्थानिकांची गैरसोय लवकरच दूर करू – मंत्री शिवेंद्रराजे भोसले – महासंवाद

    - Advertisement -

    अमरावती, दि. ११ (जिमाका): रेल्वे मार्गिकेचा विस्तार, अप्रोच रोड आदिंसह सर्व तांत्रिक बाबींचा सखोल विचार करून शहरातील मध्यवर्ती रेल्वे स्टेशन येथील पुलाचे काम ऑक्टोबर महिन्यापासून सुरु होणार असून हे काम गतीने पूर्ण करून स्थानिक नागरिकांची गैरसोय लवकर दूर करण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे यांनी आज येथे दिली.

    येथील जुना व जीर्ण झाल्याने  पाडण्यात आलेल्या रेल्वे  पुलाची पाहणी मंत्री श्री. भोसले यांनी केली. आमदार सुलभा खोडके, राजेश वानखडे, संजय खोडके, प्रवीण पोटे, महारेलचे सह महाव्यवस्थापक संग्राम पाटील, सार्वजनिक बांधकाम अमरावती प्रादेशिक विभागाच्या मुख्य अभियंता सुषमा बोंद्रे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

     

    मंत्री श्री. भोसले यांनी सांगीतले, विधिमंडळात अमरावतीतील या रेल्वे पुलाचा विषय उपस्थित झाला होता व राज्य शासनाने यास सकारात्मक प्रतिसाद देत हे काम तातडीने हाती घेण्याचा निर्णय घेतला. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने या कामासाठी अर्थसंकल्पात १३० कोटींची तरतूद करून निधीस मंजुरीही देण्यात आली. राज्यातील सर्व रेल्वे पुलांची कामे महारेलद्वारेच करण्यात यावीत हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. आता हे काम महारेल करीत असून यासंदर्भातील निविदा प्रक्रिया व अनुषंगिक कामे पूर्णत्वास जात आहेत. भविष्यात रेल्वे मार्गिकेचा विस्तार करणे तसेच अप्रोच रोड जोडण्यासह सर्व तांत्रिक बाबींचा सखोल अभ्यास करून ही कामे हाती घेण्यात येत आहेत.

    येत्या ऑक्टोबर महिन्यात या कामाला सुरुवात होणार आहे. रेल्वे पूल बंद असल्याने स्थानिक नागरिकांची होत असलेली गैरसोय पाहता लवकरात लवकर ही कामे पूर्ण करण्यात येतील, असेही मंत्री श्री. भोसले यांनी सांगितले.

    ००००

    - Advertisement -