मुंबई, दि. ६ : गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील जनजीवन आणि परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून, मुंबईकरांनी संकटसमयी प्रशासनाला केलेले सहकार्य अतिशय मोलाचे आहे, असे प्रतिपादन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज केले. मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षाला (Disaster Management Center) प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
याप्रसंगी सभागृह नेता श्री. गणेश खणकर, महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे (IAS), अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्रीमती प्राजक्ता वर्मा – लवंगारे (IAS), अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्री. अविनाश ढाकणे (IAS), उपायुक्त (आरोग्य) श्री. शरद उघडे आणि महानगरपालिकेचे संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी परिस्थितीवर प्रकाश टाकताना सांगितले की, मुख्यमंत्री महाेदयांनी विधानसभेत नमूद केल्याप्रमाणे हा निसर्गाचा मोठा प्रकोप असून ही अभूतपूर्व परिस्थिती आहे. एकाच दिवसात शहरात ३५० पेक्षा जास्त झाडे उन्मळून पडल्याची घटना घडली. मात्र, अशा कठीण परिस्थितीतही महानगरपालिकेचे डिषास्टर डिपार्टमेंट आणि सरकारी यंत्रणा अत्यंत वेगाने आणि युद्ध पातळीवर रस्त्यांवरील झाडे हटवणे व पाण्याचा निचरा करण्याचे काम करत आहेत.
मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी खबरदारीचे उपाय
नागरिकांची, विशेषतः लांबच्या अंतरावरून प्रवास करणाऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाने अत्यंत सतर्कतेने पावले उचलली आहेत. एक आवश्यक खबरदारीचा उपाय (Precautionary Measure) म्हणून सकाळी शाळा-कॉलेजेसना सुट्टी जाहीर करण्यात आली आणि त्यानंतर दुपारच्या सत्रात सरकारी कार्यालयांनाही सुट्टी देण्यात आली, जेणेकरून प्रवाशांना सुरक्षितपणे घरी पोहोचता येईल.
मुंबई थांबलेली नाही; जनजीवन सुरळीत
मंत्री लोढा यांनी अत्यंत सकारात्मकता व्यक्त करत सांगितले की, एवढ्या मोठ्या संकटानंतरही मुंबई कुठेही थांबलेली नाही. खबरदारीमुळे लोकल रेल्वेचा वेग काहीसा संथ असला तरी वाहतूक पूर्णपणे सुरू आहे. रस्त्यांवरील पाणी आणि झाडे पूर्णपणे साफ करून रस्ते वाहतुकीसाठी मोकळे करण्यात आले आहेत.
अहोरात्र झटणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कौतुक
“गेल्या तीन दिवसांपासून महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी दिवस-रात्र एक करून ऑन-फील्ड काम करत आहेत. संकटसमयी राजकारण न करता आपण सर्वांनी प्रशासनाच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे आणि त्यांच्या या अविरत परिश्रमांचे कौतुक (Appreciation) केले पाहिजे,” असे आवाहन मंत्री लोढा यांनी यावेळी केले.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, ९० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार सर्वांना व्हॉट्सॲपद्वारे सतर्कतेचे संदेश पाठवण्यात आले असून, पुढील कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे.



















WhatsApp