मुंबई, दि. ७: राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) विभागातील कथित गैरव्यवहार, कर चुकवेगिरी आणि अनियमिततांच्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.
सदस्य विजय वडेट्टीवार यांनी या संदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना ते बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, यासंदर्भात परिवहन मंत्र्यांशी चर्चा केली असून, सभागृहातील सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांची गंभीर दखल घेण्यात आली आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या विषयावरील चर्चेला उत्तर देताना यासंदर्भातील सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, महागड्या लक्झरी वाहनांच्या नोंदणीसंदर्भात काही प्रकरणांमध्ये कर चुकवेगिरी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. काही वाहनमालक महाराष्ट्रात वास्तव्यास असून राज्यातील बँकांकडून कर्ज घेत असतानाही वाहनांची नोंदणी मात्र दादरा-नगर हवेली, दमण-दीव, पुदुच्चेरी आदी ठिकाणी केल्याची उदाहरणे समोर आली आहेत. अशा प्रकारांवर आरटीओकडून कारवाई सुरू आहे. भविष्यात कर चुकवेगिरी रोखण्यासाठी जीएसटी पडताळणी तसेच कर्ज व रहिवासाशी संबंधित कागदपत्रांची काटेकोर तपासणी करण्यात येईल.
आरटीओ विभागासंदर्भात प्राप्त झालेल्या तक्रारी, ध्वनिचित्रफिती आणि अन्य आरोपांची स्वतंत्र चौकशी करण्यासाठी वरिष्ठ आयपीएस अधिकारी प्रियंका नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे. या त्रिसदस्यीय समितीत अतिरिक्त परिवहन आयुक्त रवी गायकवाड आणि दक्षता अधिकारी मंदार जावळे यांचा समावेश आहे. या समितीला एका महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.
००००
बी.सी.झंवर/विसंअ






















WhatsApp