नंदुरबार, दि. १७ (जिमाका): जिल्ह्यात यंदा सरासरी 860 मिमी पावसाच्या तुलनेत आतापर्यंत केवळ 85 मिमी, म्हणजेच अवघा 9.9 टक्के पाऊस झाला असून त्यामुळे खरीप हंगामासाठी पाणी उपलब्धता तसेच पाणीटंचाई असलेल्या गावांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी तात्काळ नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.

जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित जिल्ह्यातील पर्जन्यमान, पेरणी परिस्थिती, बी -बियाणे, खते आदीबाबत आढावा बैठकीत पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते.
यावेळी आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार आमश्या पाडवी, जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, पोलीस अधिक्षक अश्विनी सानप, निवासी उप जिल्हाधिकारी आशा संघवी, नगरपालिका प्रशासन जिल्हा सहआयुक्त जमीर लेंगरेकर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शंकर किरवे तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले,अनेक दिवस पावसाचा खंड पडल्याने पेरण्या रखडल्या असून उगवलेली पिकेही धोक्यात आली आहेत, ही पिके वाचवण्यासाठी पाणी महत्त्वाचे असून 21 जुलै नंतर पाऊस अपेक्षित असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे. आज काही गाव सोडली तर जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात आहे, पुढे पाऊस पडणार असल्यामुळे, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची संकट येणार नाही अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
तालुकानिहाय आढावा घेताना त्यांनी सांगितले की, नवापूर आणि नंदुरबार तालुक्यात तुलनेने अधिक पाऊस झाला असला तरी शहादा, तळोदा आणि अक्कलकुवा तालुक्यांत अत्यल्प पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीत सुमारे 81 टक्के पेरणी झाली होती, तर यंदा केवळ 42 टक्के क्षेत्रावरच पेरणी पूर्ण झाली आहे.
पाणीपुरवठ्याच्या स्थितीबाबत त्यांनी सांगितले की, नंदुरबार शहराला विरचेक धरणातून सुमारे 47 टक्के उपलब्ध साठ्यावरून दर दोन दिवसांनी पाणीपुरवठा केला जातो सध्या शहरी भागात गंभीर टंचाईची परिस्थिती नाही. असे त्यांनी यावेळी सांगितले. ग्रामीण भागात मात्र अक्कलकुवा तालुक्यातील पाच गावांतील 13 वाड्यावस्त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. तसेच 209 गावांमध्ये विंधन विहिरींसाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून त्यापैकी 180 कामे पूर्ण झाली आहेत. नंदुरबार तालुक्यात सात गावांमध्ये विहिरी व बोअरवेल संपादन करून पाणीपुरवठा करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
यंदा पावसाचा खंड पडण्यामागे ‘अल निनो’चा प्रभाव असल्याचे सांगत पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले की, हवामान खात्याच्या अंदाजानुसार 21 जुलैनंतर पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. 31 जुलैपर्यंतची परिस्थिती लक्षात घेऊन पुढील निर्णय घेतले जातील. नंदुरबारचा दीर्घकालीन विकास हा उपलब्ध पाण्याच्या प्रभावी नियोजनावर अवलंबून असून पालकमंत्री म्हणून या विषयाला सर्वोच्च प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विशेष पाठपुरावा करून आवश्यक निधी उपलब्ध करून घेण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
बैठकीनंतर आमदार चंद्रकांत रघुवंशी व आमदार आमश्या पाडवी यांनी आपल्या जिल्ह्यातील विविध मागण्यांसदर्भात पालकमंत्रीमुश्रीफ यांना निवेदन दिले.
जिल्हाधिकारी डॉ. सेठी यांनी यावेळी जिल्ह्यातील पर्जन्यमान बी बियाणे पेरणी संदर्भात माहिती दिली.
०००






















WhatsApp