नागपूर, दि. १८ : उमद्या व्यक्तिमत्त्वाचे धनी असलेल्या बाबुराव तिडके यांनी नेहमीच जनसामान्यांचा विचार केला. इतरांच्या जीवनात आनंद पेरण्याचे काम त्यांनी आयुष्यभर केले. त्यामुळेच त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्या मोठी आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबुराव तिडके यांना आदरांजली वाहिली. दिंवगत तिडके यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी चिटणवीस सेंटर येथे आयोजित सर्वपक्षीय सभेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

यावेळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

आपल्या वडिलांशी तिडके यांची घनिष्ठ मैत्री होती असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पक्षाच्या पलिकडे मैत्री जपण्याचा त्यांचा स्वभाव होता. सहकाराच्या क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय काम केले. आपला साखर कारखाना अडचणीत आला त्यावेळी तो वाचावा, कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत देता यावे यासाठी गृहलक्ष्मीचे दागिने त्यांनी तारण ठेवले, इतकी कळकळ त्यांच्यात होती, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, तिडके हजरजबाबी होते. भूविकास बँकेचे अध्यक्ष म्हणून काम करताना शेतकऱ्यांच्या अडचणी त्यांनी सोडविल्या. संबंधांमध्ये त्यांनी कधी पक्ष येऊ दिला नाही.
सहकार, शिक्षण, सामाजिक अशा क्षेत्रातील ते मार्गदर्शक होते, असे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यावेळी म्हणाले. समाजाप्रती कळकळ असलेल्या या नेत्याचा जीवन प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, असे पालकमंत्री बावनकुळे यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे संचालन बाळ कुलकर्णी यांनी केले.
०००






















WhatsApp