सच्चा गांधीवादी, समाजवादी ‘सप्तर्षी’ निखळला – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतली नसरापूर घटनेतील पीडित कुटुंबीयांची भेट – महासंवाद
- Advertisement -



मुंबई दि. १८: ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, गांधीवादी नेते, लेखक आणि तरुण पिढीचे मार्गदर्शक डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या निधनामुळे सच्चा गांधीवादी व समाजवादी ‘सप्तर्षी’ निखळला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, डॉ. सप्तर्षी यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजातील वंचित, शोषित घटकांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि गांधीवादी विचारांच्या प्रसारासाठी समर्पित केले. युवक क्रांती दलाच्या (युक्रांद) माध्यमातून त्यांनी तरुणांमध्ये एक नवी ऊर्जा आणि सामाजिक जाणीव निर्माण केली. डॉ. सप्तर्षी हे अच्युतराव पटवर्धन एस. एम. जोशी, ना. ग. गोरे यांच्या समाजवादी परंपरेत वाढले. महात्मा गांधी आणि जयप्रकाश नारायण यांच्या विचारांचे ते आयुष्यभर कट्टर अनुयायी राहिले. विविध आंदोलनांमध्ये त्यांच्या सक्रिय सहभागाने त्यांना ‘सत्याग्रही’ म्हणून ओळख लाभली.

डॉ. सप्तर्षी यांच्या लेखनाने आणि भाषणांनी अनेकांना प्रेरित केले. त्यांच्या सामाजिक बांधिलकी आणि साधेपणाने ते सर्वांचे आदर्श होते.  लोकशाही मूल्यांचा आग्रह धरत असतानाच सामाजिक न्यायाच्या लढ्यातही ते कायम अग्रेसर असत. विधानपरिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी सभागृहात उमटवलेली छाप आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून रस्त्यावर केलेला संघर्ष कायम स्मरणात राहील. डॉ. सप्तर्षी यांच्या कुटुंबियांना, सहकाऱ्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

०००



Source link

- Advertisement -