मुंबई, दि. २४ : राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना – २०२६’ अंतर्गत १६ लाख ९६ हजार पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या याद्याही लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली. या योजनेअंतर्गत राज्यातील सुमारे ५६ लाख पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. पात्र शेतकऱ्यांनी लाभ मिळविण्यासाठी ॲग्रीस्टॅकवर नोंदणी करून आधार प्रमाणीकरण प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले.
योजनेतील पात्र लाभार्थ्यांची यादी संबंधित बँकांनी महाआयटीने विकसित केलेल्या पोर्टलवर अपलोड केली असून त्याची पडताळणी पूर्ण झाली आहे. आधार प्रमाणीकरणासाठी पात्र शेतकऱ्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे सूचना पाठविण्यात येणार आहेत. तसेच ग्रामपंचायत कार्यालये, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था आणि संबंधित बँक शाखांमध्येही लाभार्थ्यांच्या याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. योजनेतील प्रत्येक पात्र लाभार्थ्याला एक विशिष्ट ओळख क्रमांक देण्यात येणार आहे. आधार क्रमांक किंवा या विशिष्ट क्रमांकाच्या आधारे आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक राहणार असून, राज्यातील सुमारे ३२ हजार ‘आपले सरकार सेवा केंद्रांमार्फत ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
ॲग्रीस्टॅकवरील नोंदणी आणि आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांच्या कर्ज खात्यात डीबीटी प्रणालीद्वारे कर्जमुक्तीची रक्कम जमा करण्यात येणार आहे. ही योजना केवळ कर्जमुक्ती पुरती मर्यादित नसून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून नव्या उमेदीने शेतीसाठी बळ देणारी योजना असल्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले.
0000
काशीबाई थोरात/विसंअ





















WhatsApp