राज्यातील ४०४ नागरिक सुरक्षित; ३३८ जण संपर्कात

- Advertisement -


  • नेपाळमधील महाराष्ट्रातील नागरिक व धार्मिक पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांच्या  मदतीसाठी विविध  शासकीय यंत्रणा कार्यरत

मुंबई, दि. २९: नेपाळ येथील महापुरामध्ये अडकलेले महाराष्ट्रातील नागरिक व धार्मिक पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांच्या मदतीसाठी विविध पातळीवर शासकीय यंत्रणा अहोरात्र प्रयत्न करत आहेत. सर्वजण सुरक्षितपणे त्यांच्या गावी परत पोहोचण्यासाठी सतर्कतेने योग्य नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

सागा येथून ४१ जण आज परतले असून १०६ जण नागपूरला उद्या पहाटे ४:३० वाजता पोहोचतील. जवळपास १४३  नागरिक राज्यात यशस्वी व सुरक्षितरित्या परतण्याच्या मार्गावर असून नेपाळमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आले आहेत. मंत्रालयातील नियंत्रण कक्षात २४ तास हा कक्ष कार्यरत असून महाराष्ट्रातील नागरिकांसाठी सहाय्यता व मदतकार्य समन्वय साधला जात आहे.

महाराष्ट्रातील ४५ पर्यटकांचा भारतीय हद्दीत सुरक्षित प्रवेश

राज्यातील ४५ जणांच्या पर्यटकांच्या ग्रुपने आज भारतीय हद्दीत  प्रवेश केला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथील ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून नाशिक, पुणे, मुंबई व अहिल्यानगर येथील नागरिक नेपाळ येथे गेले होते. महापुराच्या घटनेच्या कालावधीत हे नागरिक चितवन येथे होते. आज काठमांडूकडे जाणारे मार्ग बंद असल्याने नेपाळमधील लुंबिनी मार्गे त्यांना आणण्यात येत असून आज अयोध्या पोहोचल्यानंतर पुढील नियोजन शासनाच्या सूचनेनुसार केले जाणार आहे.

राज्यातील ४०४ नागरिक सुरक्षित व ३३८ संपर्कात

आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन सूचनानुसार महाराष्ट्र शासन तसेच केंद्र सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या माध्यमातून आवश्यक मदत देण्यासाठी कार्यवाही केली जात आहे. आत्तापर्यंत प्राप्त माहितीनुसार राज्यातील ४०४ नागरिक सुरक्षित असून ३३८नागरिकांशी संपर्क झाला आहे.

अजून १४९ भारतीय पर्यटकांचा चीनमधून नेपाळमध्ये सुरक्षितरित्या प्रवेश

परराष्ट्र मंत्रालयाकडून काल २८ ऑगस्ट अखेरपर्यंत चीनमधून नेपाळमध्ये सुरक्षितरित्या प्रवेश केलेल्या १४९ भारतीय पर्यटक नागरिकांची यादी राज्यांना पाठवण्यात आली आहे. यातील त्यांच्या जिल्ह्यांमध्ये सुरक्षितरित्या पोहोचविण्यासाठी कार्यवाही केली जात आहे. यातील महाराष्ट्रातील जिल्ह्यांतील संबंधित नागरिकांना असतील त्यांचे माहिती व नावे खात्री करून एकत्रित करण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. हे पर्यटक लवकरच भारतात परतणार आहेत. यामध्ये मुंबई शहर किंवा मुंबई उपनगर जिल्ह्यांतील कोणत्याही नागरिकाबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाला (BMC EOC) आतापर्यंत कोणताही कॉल आलेला नाही.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तातडीच्या पुढाकारानंतर बसेस व प्रवासासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात येऊन या पर्यटकांना भारतात आणले जात आहे. तर नागपूर येथील १०६ जणांचा प्रवास आज बिहार मार्गे नागपूरच्या दिशेने सुरू झाला आहे.

बोरीवली आणि अंधेरी येथील ८ पर्यटक

बोरीवली आणि अंधेरी येथील ८ पर्यटकांची माहिती देण्यात आली असून. आपत्तीमुळे ते नेपाळमध्ये अडकले आहेत. यापैकी अंधेरी येथील लक्ष्मीनारायण आचार्य यांच्याकडून अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला जात आहे परंतु त्यांचा अथवा ग्रुप मधील इतराचा  मोबाईलद्वारे संपर्क होत नसल्याने सद्यस्थितीत अडचणी येत आहेत. त्यांच्याशी संपर्क प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. मुंबईतील या पर्यटकांच्या नातेवाईकांच्या  संपर्कात प्रशासन आहे.

०००



Source link

- Advertisement -