Home ताज्या बातम्या दोन मासेमारी गटात भर समुद्रात संघर्ष; एलईडी फिशींगवरुन झाला वाद

दोन मासेमारी गटात भर समुद्रात संघर्ष; एलईडी फिशींगवरुन झाला वाद

0

अलिबाग :मासेमारी करणाऱ्या दोन गटांमध्ये मुरुड-कोर्लईच्या भर समुद्रामध्ये संघर्ष उफाळून आला. अलिबाग तालुक्यातील आक्षीमधील एक गट एलईडी फिशींग करत असल्याने त्यांना रेवस – बोडणीमधील मासेमारी करणाऱ्यांनी हटकले असता दोन्ही गटामध्ये तुफान हाणामारी झाली. त्यामध्ये दोन्ही गटातील बोटींचे नुकसान झाल्याचे बोलले जाते. बोडणीमधील मासेमारी करणाऱ्यांनी आक्षीमधील बोटींवर ताबा मिळवला. त्यानंतर ते मांडव्याच्या दिशेने त्यांना घेऊन निघाले आहेत. त्यांना पोचण्यासाठी तब्बल सहा तासांचा अवधी लागणार असल्याचे बोलले जाते.

एलईडी फिशींग करणे कायद्याने गुन्हा असताना देखील आक्षी येथील चार मासेमारी बोटी एलईडीच्या माध्यमातून मुरुड-कोर्लई परिसरात मासेमारी करत होत्या. सदरची बाब रेवस-बोडणी येथील मासेमारी करणाऱ्यांना आढळली. त्यामुळे त्यांनी आक्षीवाल्या बोटीतील मासेमारी करणाऱ्यांना हटकले. त्याचा राग आल्याने एका गटाने दुसऱ्या गटावर दगड फेक केल्याचे बोलले जाते. त्यामुळे बोडणीमधील गटाने त्याच परिसरात मासेमारी करणाऱ्या अन्य सहकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यानतंर काही कालावधीत अन्य बोटी तेथे आल्यानंतर दोन्ही गटामध्ये भर समुद्रामध्य संघर्ष सुरु झाला. त्यानंतर रेवसमधील मासेमारी करणाऱ्यांनी आक्षीच्या बोटींवर ताबा मिळवला आणि त्यांना पकडून मांडवा सागरी पोलीस ठाण्यात घेऊन जाण्यासाठी ते निघाले. ही बाब आक्षीमधील अन्य मासेमारी करणाऱ्यांना कळताच. तेथील काही मासेमारी करणारे पूर्ण तयारीकरुन आपल्या सहकार्याच्या मदतीला निघाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. रात्री उशिरापर्यंत हे नाटय़ समुद्रामध्ये सुरु होते.

आक्षी आणि बोडणी परिसरातील दोन गटांमध्ये संघर्ष झाल्याची माहिती मिळाली आहे. सदरची घटना 12 नॉटीकल माईल्स्च्या बाहेर झाली असल्याने हे प्रकरण मुंबई यलोगेट पोलिसांच्या अखत्यारीत येत असल्याचे मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धर्मराज सोनके यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

याबाबत भारतीय तट रक्षक दलाचे सहायक कमांडंट कृष्णा कुमार यांच्यासी संपर्क साधला असता त्यांनी सुट्टीवर असल्याचे सांगितले. याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी मुरुड येथील तट रक्षक दलाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे लोकमतशी बोलताना सांगितले. दोन गटामध्ये संघर्ष झालेला आहे. सदरची घटना 12 नॉटीकल माईल्सच्या बाहेरची आहे. असे असले तरी, संबंधीतांनी आमच्याकडे तक्रार दिल्यास ती घेतली जाईल. अद्यापही दोन्ही गटांच्या बोटी समुद्रामध्येच प्रवासात आहेत. त्यांना पोचण्यासाठी सुमारे सहा तासांचा अवधी लागेल. परिस्थीतवर आम्ही लक्ष ठेऊन असल्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारसकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.