मध्य प्रदेश : २०१३ मधील व्यापम पोलीस भरती प्रकरणातील विशेष सीबीआय कोर्टाने सर्व 31 आरोपींना आज दोषी ठरवले आहे. आता 25 नोव्हेंबरला याप्रकरणी या दोषी आरोपींना शिक्षा सुनावण्यात येणार आहे. सीबीआयने 31 आरोपींविरूद्ध आरोपपत्र दाखल केले होते असून सर्व आरोपी जामिनावर तुरुंगाबाहेर होते त्यांना आजच्या निकालानंतर कोठडीत पाठविण्यात आले आहे.
काय आहे व्यापम घोटाळा?
मध्य प्रदेशमध्ये सरकारी नोकऱ्यांमध्ये नियुक्ती आणि वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेशामधील झालेल्या मोठय़ा गैरव्यवहाराला व्यापम घोटाळा म्हणून ओळखले जाते. व्यावसायिक परीक्षा मंडळ (व्यापमं) हे खरे नाव असले तरी नावाप्रमाणेच या घोटाळ्याची व्याप्ती मोठी आहे. यामध्ये २४ आरोपींसह घोटाळ्याशी संबंधित ४० जणांचे संशयास्पद मृत्यू झाले आहेत. तर आजवर मोठमोठ्या नेत्यांसह दोन हजारावर लोकांना अटक करण्यात आली. २००९ मध्ये या घोटाळ्याला सुरुवात झाली होती. २०१३ मध्ये या घोटाळ्याला वाचा फुटली. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यावरही घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप करण्यात येत होते.