Home शहरे पुणे ‘एनडीए’त ‘फेल’ झाले तरी मिळणार डिग्री : कुलगुरू प्रा. एस. के. श्रीवास्तव

‘एनडीए’त ‘फेल’ झाले तरी मिळणार डिग्री : कुलगुरू प्रा. एस. के. श्रीवास्तव

0

पुणे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील तीन वर्षांचे प्रशिक्षण अतिशय खडतर असते. हे अवघड प्रशिक्षण घेत असताना एखादा कॅडेट जखमी होऊन किंवा अन्य कारणांनी प्रबोधिनीतील तीन वर्षे पूर्ण करू शकत नाही. एनडीएतील संधी तर हुकतेच शिवाय त्याचे शैक्षणिक नुकसानही होते. यापुढे मात्र अशा विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण नॉर्थ ईस्टर्न हिल युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून पूर्ण करता येणार आहे. त्याबाबतचा सामंजस्य करार संरक्षण मंत्रालय आणि विद्यापीठ लवकरच करणार आहे, अशी माहिती नॉर्थ ईस्टर्न हिल युनिव्हर्सिटीचे कुलगुरू प्रा. एस. के. श्रीवास्तव यांनी दिली. 
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १३७ व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा हबीबुल्लाह सभागृहात पार पडला. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे कमांडन्ट एअर मार्शल आय. पी. व्हिपीन, डेप्युटी कमांडन्ट रिअर डमिरल एस. के. ग्रेवाल, प्राचार्य ओमप्रकाश शुक्ला उपस्थित होते. 
श्रीवास्तव म्हणाले, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतून भारतीय संरक्षण दलाचे नेतृत्व करणारे कुशल अधिकारी तयार होतात. प्रबोधिनीच्या तीन वर्षांच्या काळात त्यांना 
नेतृत्वगुण, निर्णयक्षमता, कठीण परिस्थितीत निर्णय घेण्याची क्षमता यासारख्या गोष्टी शिकायला मिळतात.
हे तीन वर्षांचे प्रशिक्षण अतिशय कठीण असते. या प्रशिक्षणादरम्यान काही कारणास्तव कॅडेटना ३ वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण करता येत नाही. त्याचे हे नुकसान टाळण्यासाठी नॉर्थ ईस्टर्न हिल युनिव्हर्सिटीमार्फत प्रयत्न सुरू आहेत. याचा पहिला टप्पा म्हणून केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयासोबत चर्चा सुरू आहे. भविष्यातही यावर बैठका घेतल्या जाणार आहेत. 
एअर मार्शल आय. पी. व्हीपीन म्हणाले, देशाला सर्वगुणसंपन्न अशा लष्करी अधिकाºयांची आवश्यकता आहे. हे अधिकारी युद्धभूमीत हुशारीने युद्ध लढू शकतील. त्याच्या जोरावर देशाची एकात्मता व सार्वभौमत्व जपण्यासाठी भविष्यातील अधिकारी म्हणून कार्य कराल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 
डेप्युटी कमांडन्ट रिअर अ‍ॅडमिरल एस. के. ग्रेवाल यांनी आभार मानले. लेफ्टनंट कमांडर अर्चना चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. 
……
 राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १३७ तुकडीत एकूण २८४ जणांना पदवी प्रदान केली. यात १३ परदेशी विद्यार्थी आहेत. बीएस्सीचे ४२, बीएस्सी कॉम्प्युटर सायन्सचे ८५, आर्ट्स विभागाचे ८४ व बी.टेक विभागाच्या ७३ कॅडेट्सचा समावेश आहे. या तिन्ही वर्षांत चांगले गुण मिळवल्याने या वर्षी विज्ञान शाखेतून स्कॉर्डनलिडर कॅप्टन अनुराग पांडे याला चीफ आॅफ आर्मी स्टाफ ट्रॉफी व कमांडन्ट सिल्वर मेडलने गौरविले. 
……बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स विभागातून अ‍ॅकॅडमिक केडेट कॅप्टन माझी गिरीधर या विद्यार्थ्यांला चिफ आॅफ नेव्हल स्टाफ ट्रॉफी व कमांडन्ट सिल्व्हर मेडलने गौरविले. कला शाखेतून सुमंत कुमार या विद्यार्थ्याला चिफ आॅफ एअर स्टाफ ट्रॉफी व कमांडन्ट सिल्व्हर मेडलने गौरविले. तर बीटेक शाखेत सहाव्या सेमिस्टरपर्यंत प्रथम आलेला निशांत विश्वकर्मा या विद्यार्थ्याला कमांडन्ट सिल्व्हर मेडल व अ‍ॅडमिरल ओ. एस. डॉसन ट्रॉफने सन्मानित केले.  
……
प्रशिक्षणाला ३७ नौसेना तर, ३६ हवाई दलाचे कॅडेट्स
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत २०१६ सालामध्ये बी-टेक अभ्यासक्रम सुरू केला. या अभ्यासक्रमाचे ३ वर्षे यशस्वीपणे पूर्ण झाले आहे. बी-टेक अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण प्रबोधिनीत घेतल्यानंतर हे विद्यार्थी एयर फोर्स अ‍ॅकॅडमी हैदराबाद येथून सातव्या व आठव्या सेमिस्टरचे प्रशिक्षण घेणार आहेत, अशी माहिती शुक्ला यांनी दिली. या अभ्यासक्रमाला ३७ नौसेना तर, ३६ हवाई दलाचे प्रशिक्षण घेणारे कॅडेट्स आहेत. त्यांची गुणवत्ताही चांगली आहे, असे शुक्ला म्हणाले. 
……..
एनडीएतून मिळाले नेतृत्व गुण
च्राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील तीन वर्षांचे खडतर प्रशिक्षण आम्ही पूर्ण केले. तीन वर्षांच्या काळात शिक्षकांचे मार्गदर्शन व मित्रांची साथ यामुळे नेतृत्वगुणाचा विकास करू शकलो. भविष्यात मला लष्कराच्या गोरखा 
रायफल रेजिमेंटमध्ये दाखल व्हायचे आहे, असे मत रौप्यपदक विजेता माजी गिरिधर याने व्यक्त केली. 
 माझी हा मूळचा विशाखापट्टण येथील आहे. त्याचे वडील कोळसा खाणीत आहे. घरी लष्कराची कुठलीही पार्श्वभूमी नसताना त्याने एनडीएत दाखल होण्याचे स्वत:चे स्वप्न पूर्ण केले. तो म्हणाला सुरुवातीचा काळ कठीण गेला. घरच्यांशी बोलता येत नव्हते. मात्र, मित्रांनी आणि शिक्षकांनी सांभाळल्याने येथील प्रशिक्षण पूर्ण करू शकलो.
……….
वडील लष्करात नायब सुभेदार म्हणून कार्यरत आहे. त्यांनी लहानपणापासून देशसेवा करण्यास सांगितले. यासाठी ‘लष्करात मोठा अधिकारी हो’ या त्यांच्या सल्ल्यानुसार मी एनडीएची तयारी केली. परीक्षा पास होत मी तीन वर्षांचे प्रशिक्षणही पूर्ण केले आहे, असे मत चिफ ऑफ एअरस्टाफ ट्रॉफीचा विजेता सुमंत कुमार याने व्यक्त केले. 
सुमंत हा मूळचा बिहार राज्यातील समस्तीपूर येथील आहे. त्याचे बालपण कठीण गेले. त्यानंतर त्याने झारखंड येथील तिलीया सैनिकी शाळेत प्रवेश घेतला. या शाळेत अधिकारी होण्यासाठी त्याच्यावर संस्कार झाले. यासोबतच वडिलांचे मार्गदर्शनही त्याला मिळाले. 
…..
सैनिक शाळेनी दिली लष्कराची प्रेरणा
डेहराडून येथील लष्करी शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. या शाळेत असलेली शिस्त व येथे मिळालेले शिक्षण यामुळे मला लष्करात येण्याची प्रेरणा मिळाली. एनडीएच्या परीक्षेची तयारी माझी शाळेतच झाली. 
भविष्यात नौदलात नेव्हीगेटिंग आॅफिसर व्हायचे आहे अशी इच्छा बीटेक विषयातील रौप्यपदक 
विजेता निशांत विश्वकर्मा याने व्यक्त केली. निशांत हा मूळचा मध्य प्रदेशातील आहे. त्याचे वडील 
वेटरनरी विभागात डेप्युटी डायरेक्टर आहेत. त्याला फिरण्याची व साहसाची आवड असल्याने हे क्षेत्र निवडल्याचे निशांत म्हणाला.    
……..
वडिलांचे स्वप्न पूर्ण केल्याचा अभिमान
माझे आजोबा लष्करात बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपमध्ये होते. वडिलांनाही लष्करात जायचे होते. मात्र, त्यांचे स्वप्न त्यांना पूर्ण करता आले नाही. त्यांनी उत्तर प्रदेश पोलीस सर्व्हिसमध्ये हवालदार म्हणून काम सुरू केले. त्यांनी त्यांचे स्वप्न माझ्यात पाहिले. लहानपणापासून प्रेरित केले. आज त्यांचे स्वप्न पूर्ण करू शकलो याचा अभिमान आहे, असे मत चीफ आॅफ आर्मी स्टाफ ट्रॉफी स्टाफ व रौप्यपदकाचा मानकरी अनुराग पांडे याने व्यक्त केले. अनुराग हा उत्तर प्रदेशातून उन्नाव येथील रहिवाशी आहे. त्याने त्यांचे शिक्षण सेंट जॉर्ज शाळेतून पूर्ण केले. त्यानंतर दिल्ली विद्यापीठात असताना त्याने एनडीएची परीक्षा उत्तीर्ण केली. त्याला रणगाड्यांचे आकर्षण असल्याने भविष्यात आर्मड रेजिमेंटमध्ये दाखल व्हायचे आहे. पुढील प्रशिक्षणासाठी तो डेहराडून येथील इंडियन मिलिटरी अ‍ॅकॅडमीत जाणार आहे.