Home शहरे कोल्हापूर कोल्हापूरजवळ तिहेरी अपघातात तिघांचा मृत्यू

कोल्हापूरजवळ तिहेरी अपघातात तिघांचा मृत्यू

0

कोल्हापूर : कोल्हापूर-रत्नागिरी  महामार्गावरील नलवडे बंगल्याजवळील ग्रीनपार्क हाॅटेलसमोर भीषण तिहेरी अपघात झाला. या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

सरोज तानाजी पोवार (वय २०, रा.मोरेवाडी, ता.करवीर), शिवरंजक साताप्पा मरेन्नवार (वय १८ रा.निमशिरगाव,ता.हातकलंगले), आकाश तानाजी कदम (वय २०, १५ वी गल्ली, जयसिंपूर) अशी मृत तरुणांची नावे आहेत. दोन दुचाकी आणि व्हॅनच्या समोरासमोर धडकेत हा अपघात दुपारी एक वाजता घडला. विचित्र अपघातात दुचाकीचे नुकसान झाले आहे. या घटनेची नोंद करवीर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

घटना स्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, सरोज पोवार, शिवरंजक मरेन्नवार आणि आकाश कदम कोल्हापूरहून दुचाकीवरून पन्हाळा दर्शनसाठी जात होते तर उदय भानुदास मुळे (वय ४३,रा.सांगली) हे पन्हाळ्यावरून व्हॅन घेऊन केर्ले गावाकडे येत होते.नलवडे बंगल्याजवळील ग्रीनपार्क हाॅटेलच्या समोर व्हॅन आणि दोन दुचाकीची समोरासमोर धडक झाली.या धडकेत सरोज आणि शिवरंजक यांचा जागीच मृत्यू झाला.तर आकाशवर सीपीआरमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला.हा विचित्र अपघात पाहण्यासाठी रस्त्यावर गर्दी झाल्याने पन्हाळा पोलिसांनी घटनास्थळी येऊन वाहतुक सुरळीत  केली.