Home बातम्या आंतरराष्ट्रीय पाकिस्तानला धक्का; निजामाचे 325 कोटी भारताच्या तिजोरीत जमा

पाकिस्तानला धक्का; निजामाचे 325 कोटी भारताच्या तिजोरीत जमा

0

लंडन: निजाम फंड खटल्यात भारतानंपाकिस्तानला जोरदार धक्का दिला आहे. लंडनमध्ये सुरू असलेला खटला भारतानं जिंकल्यानं आता निजामाचा खजिना भारताला मिळाला आहे. तर पाकिस्तानला दुहेरी दणका बसला आहे. पाकिस्तानच्या हातून निजमाचा खजिना निसटल्यानं त्यांच्यावर कोट्यवधी रुपयांचा फटका सहन करण्याची नामुष्की ओढावली आहे. याशिवाय हा खटला लढण्यासाठी भारतानं खर्च केलेल्या एकूण रकमेपैकी ६५ टक्के खर्चदेखील (२६ कोटी रुपये) पाकिस्तानला द्यावा लागणार आहे. 

निजामाच्या १ मिलियन पाऊंडवर भारतानं दावा सांगितला होता. गेल्या ७० वर्षांपासून याबद्दलचा वाद सुरू होता. सात दशकांमध्ये खजिनातल्या संपत्तीचं मूल्य ३५ मिलियन पाऊंड्सवर जाऊन पोहोचलं. लंडनमधल्या एका बँकेत ७० वर्षांपासून ही रक्कम अडकून पडली होती. आता ही रक्कम भारताच्या ब्रिटनमधल्या दुतावासाकडे सुपूर्द करण्यात आली आहे. टाईम्स ऑफ इंडियानं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. 

निजाम फंड खटल्याचा निकाल लागल्यानंतर ३५ मिलियन पाऊंड्स (३२५ कोटी रुपये) मिळाल्याची माहिती भारताच्या ब्रिटनमधल्या दुतावासातल्या अधिकाऱ्यांनी दिली. २० सप्टेंबर १९४८ पासून ही रक्कम नॅशनल वेस्टमिन्स्टर बँक खात्यात अडकली होती. पाकिस्ताननं या रकमेवर दावा केला होता. गेल्या ऑक्टोबरमध्ये उच्च न्यायालयानं भारताच्या आणि मुकर्रम जाह (हैदराबादचा आठवा निजाम) यांच्या बाजूनं निकाल दिला. मुकर्रम आणि त्यांचा लहान भाऊ मुफ्फखम जाह पाकिस्तानविरोधात गेल्या ६ वर्षांपासून लंडन उच्च न्यायालयात खटला लढवत होते.