Home शहरे औरंगाबाद Raj Thackeray: औरंगाबाद की संभाजीनगर?; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका

Raj Thackeray: औरंगाबाद की संभाजीनगर?; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका

0

औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक हिंदुत्वाकडे वाटचाल करत असताना शिवसेनेचे मुद्दे हायजॅक करण्याचा प्रयत्न केला आहे. यातच मराठवाडा दौऱ्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे असल्यामुळे औरंगाबादचं नाव संभाजीनगर करावं अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली होती. राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी संभाजीनगर असा उल्लेख असणारे बॅनर्स लावले होते.

गेल्या काही वर्षापासून शिवसेना औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर व्हावं अशी मागणी करत आहे. मात्र मागील सत्तेच्या ५ वर्षाच्या काळात असेल अथवा सध्या आत्ताच्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून सत्तेत शिवसेना सहभागी आहे. मात्र औरंगाबादचं नामकरण करण्याचा ठोस निर्णय घेतला गेला नाही. त्यामुळे मनसेला शिवसेनेवर कुरघोडी करण्यासाठी हा मुद्दा आयताच हातात सापडला आहे. आगामी येऊ लातलेल्या महापालिका निवडणुकीत मनसेने संभाजीनगर नाव करावी ही मागणी केली आहे. याबाबत मनसेकडून मुंबईत कुर्ला एसटी डेपोमध्ये आंदोलन करण्यात आलं. मुंबई-औरंगाबाद एसटी बसेसवर मनसे कार्यकर्त्यांनी संभाजीनगर नावाचे पोस्टर्स लावले होते.

राज ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना पत्रकारांनी त्यांना नामकरणाबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, औरंगाबादचं नाव बदलले तर काय हरकत? चांगले बदल झाले पाहिजेत. अनेकजण आपली भूमिका बदलून सत्तेत गेले आहेत असं सांगत शिवसेनेला टोला लगावला. त्यामुळे आगामी काळात औरंगाबादचं संभाजीनगर नाव करण्यासाठी मनसे आक्रमकपणे भूमिका मांडणार असल्याचंही कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आलं. 

दरम्यान, मनसेला शिवसेनेचं उष्ट खाण्याची सवयच लागली आहे असं सांगत शिवसेना मंत्री गुलाबराव  पाटील यांनी मनसेवर निशाणा साधला होता. तर मनसेचे अविनाश जाधव यांनीही त्याला प्रत्युत्तर देत मागच्या ५ वर्षात शिवसेना सत्तेत होती, आताही सत्तेत आहे पण औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याची हिंमत झाली नाही आणि आम्ही त्याचा उच्चार केला तर त्याची एवढी धास्ती घेतली असा टोला शिवसेनेला लगावला आहे. त्यामुळे औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी सज्ज झाली असल्याचं दिसून येत आहे. 

शुक्रवारी सकाळी राज ठाकरे यांनी मराठवाड्यातील पत्रकारांशी गप्पा मारताना विविध मुद्द्यावर भाष्य केलं. हिंदुत्वाचा मुद्दा हातात घेतला म्हणजे विकासाकडे आता दुर्लक्ष केलं असं होत नाही. शहरांचा विकास करणं, ती शहरं घडवणं हा माझ्यासाठी राजकीय विषय नाही तर तो माझ्या पॅशनचा विषय आहे. जगातील अनेक शहरं मी जेंव्हा पाहतो तेंव्हा तिथल्या चांगल्या गोष्टी महाराष्ट्रातल्या शहरात असाव्यात असं मला वाटत राहतं म्हणून मी नाशिकमध्ये त्यातल्या अनेक गोष्टी घडवून दाखवल्या पण माझ्या एक लक्षात आलं की नाशिकमध्ये लोकं विकासाला मत देत नाहीत अशी खंतही राज ठाकरेंनी व्यक्त केली.