Home बातम्या 15 एप्रिलपासून रेल्वे सेवा सुरु होण्याची शक्‍यता

15 एप्रिलपासून रेल्वे सेवा सुरु होण्याची शक्‍यता

नवी दिल्ली: करोना संसर्गामुळे प्रवासी रेल्वेसेवा 21 दिवस स्थगित केल्यावर 15 एप्रिलपासून स्वतःच्या सर्व सेवा सुरू करण्याची तयारी रेल्वेने चालविली असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते आहे. रेल्वेचे सर्व सुरक्षा कर्मचारी, अन्य कर्मचारी, टीटीई आणि अन्य अधिकाऱयांना 15 एप्रिलपासून कामावर परतण्यासाठी तयार राहण्यास सांगण्यात आले आहे. सरकारकडून अनुमती मिळाल्यावर रेल्वेसेवा सुरू केली जाणार आहे. सध्या रेल्वेंसाठी तिकीट आरक्षणास प्रारंभ झाला आहे.

सर्व 17 विभागांना स्वतःची सेवा संचालित करण्यासाठी तयार राहण्याचा संदेश देण्यात आला आहे. चालू आठवडयाच्या अखेरीस संबंधित विभागांना ठोस कार्ययोजना पाठविली जाणार आहे. 24 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टाळेबंदीची घोषणा केल्यावर रेल्वेने 21 दिवसांसाठी 13523 रेल्वेगाडयांची सेवा रोखली होती. या कालावधीत मालगाडी सेवा मात्र सुरूच आहे. खासगी रेल्वेंसाठीही तिकीट आरक्षण सुरू झाले आहे. सेवा सुरू करण्यापूर्वी सर्व रेल्वेगाडयांना सॅनिटाईज केले जाणार आहे.

दरम्यान, 22 मार्च ते 14 एप्रिलदरम्यानच्या आरक्षण धारकांना तिकिटाचा परतावा देणे, इच्छुकांना तिकिटे बदलून देणे आणि ऑनलाईन बुकींगमधील त्रुटी सूर करण्याच्या दिशेने कार्यवाही सुरु करण्यासाठी अधिकारी आणि तंत्रज्ञ कार्यरत आहेत. तसेच रेल्वे लाईन्सची प्रलंबित असलेली दुरुस्तीची कामेही हाती घ्यायला सांगण्यात आल्याचे समजते.