Home ताज्या बातम्या लॉकडाऊनमध्ये मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी १८०० १०२ ४०४० हेल्पलाईन क्रमांकावर साधा ‘संवाद’

लॉकडाऊनमध्ये मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी १८०० १०२ ४०४० हेल्पलाईन क्रमांकावर साधा ‘संवाद’

0

शहरी, आदिवासी आणि ग्रामीण भागातील नागरिकांसाठी आदिवासी विकास विभागाचा उपक्रम

मुंबई, दि. 19 : कोरोना लॉकडाऊनच्या काळात राज्यातील शहरी, ग्रामीण आणि आदिवासी  नागरिकांना जाणवणारा मानसिक तणाव दूर करता यावा, सध्याच्या कठीण परिस्थितीत त्यांच्याशी संवाद साधून त्यांचे  मनोबल वाढवता यावे यासाठी १८०० १०२ ४०४० हा  टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात आला आहे.

            मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधताना या टोल फ्री क्रमांकाची माहिती   दिली आहे. राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या पुढाकाराने ‘प्रोजेक्ट मुंबई’ व  ‘प्रफुल्लता’ या मानसिक स्वास्थ्यासाठी काम करणाऱ्या या संस्थांच्या सहकार्याने ‘संवाद’ हा अभिनव उपक्रम १९ एप्रिलपासून  संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्यात येत आहे. ‘संवाद’ उपक्रमाच्या अंतर्गत  हेल्पलाइन  क्रमांकाच्या सहाय्याने नागरिकांना समुपदेशकांशी संवाद साधता येणार आहे.

मराठी, इंग्रजी, हिंदी भाषेत साधणार संवाद

            सध्याच्या परिस्थितीत नागरिकांचे मानसिक आरोग्यही  चिंतामुक्त ठेवण्यासाठी  ‘संवाद’ या उपक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार  आहे. लॉकडाऊनच्या काळात बहुतांश सर्व नागरिक घरात असताना त्यांचे मानसिक स्वास्थ्य उत्तम असणे, हे गरजेचे आहे. शहरी, ग्रामीण भागातील नागरिक तसेच आदिवासींना तणाव जाणवत असल्यास त्यांच्याशी संवाद होणे महत्त्वाचे आहे. याच दृष्टिकोनातून राज्य सरकारच्या आदिवासी विकास विभागाच्या पुढाकाराने ‘प्रोजेक्ट मुंबई’ व ‘प्रफुल्लता’ या संस्थांच्या सहकार्याने ‘संवाद’ हा उपक्रम  सुरु करण्यात आला आहे.

            महाराष्ट्रात विविध जिल्ह्यातील ३० समुपदेशक मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेत या नागरिकांशी सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत संवाद साधणार आहेत.

 ग्रामीण जनता व आदिवासींचे मनोबल वाढवण्यासाठी समुपदेशन- ऍड. के.सी. पाडवी

            ”संवाद’ हेल्पलाइनच्या माध्यमातून सध्याच्या लॉकडाउनच्या काळात केवळ  शहरी भागातील नागरिकांशीच नव्हे तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या ग्रामीण भागातील नागरिक आणि आदिवासींचे या उपक्रमाच्या माध्यमातून समुपदेशन केले जाणार आहे.  या संवाद उपक्रमामुळे लॉकडाउनच्या काळात नागरिकांना त्यांचे मानसिक आरोग्य उत्तम राहण्यास सहकार्य होईल, अशी आशा आहे,’’असे  आदिवासी विकास मंत्री ऍड.. के. सी. पाडवी यांनी सांगितले.

संवादाची साखळी तयार करणार – प्राजक्त तनपुरे

 ‘’या उपक्रमाच्या माध्यमातून संवादाची साखळी तयार होणार असून ग्रामीण भाग, आदिवासी पाडे येथील नागरिकांशी समुपदेशनाशी जोडले जाणार आहेत. यामुळे नागरिकांचा तणाव दूर होण्यास मदत होणार आहे’’, असे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.

असा आहे ‘संवाद’ उपक्रम

            महाराष्ट्रातील कोणत्याही  नागरिकाला ‘संवाद’च्या  १८०० १०२ ४०४० या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून त्यांना भेडसावणाऱ्या समस्या, चिंता यांचे निरसन मराठी, हिंदी, इंग्रजी अशा तिन्ही भाषांमधून करून घेता येणार आहे. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील ३० मानसोपचार तज्ञ समुपदेशक विना मोबदला या सेवेद्वारे सकाळी ८ ते रात्री ८ यावेळेत मानसिक समस्यांवर मार्गदर्शन करणार आहेत. हे मानसोपचार तज्ञ समुपदेशक स्थानिक जिल्ह्यातील  असून  नागरिकांची स्थानिक बोली जाणणारे आहेत.

स्वयंसेवकांनी सहभाग नोंदवावे

ग्रामीण भागात समुपदेशनाची सेवा देऊ इच्छिणाऱ्या समुपदेशक स्वयंसेवकांनी [email protected] या मेलआयडीवर संपर्क साधावा.