पुणे : (प्रतिनिधी) लॉक डाऊन काळात गरिबांचे हाल होत असून हातावर पोट असणाऱ्या कष्टकऱ्यांना उपाशी राहावे लागत आहे. या कठीण काळात ज्येष्ठ उद्योगपती माणिकचंद दुगड यांच्या बिबवेवाडी येथील पुष्पमंगल कार्यालयात अन्नछत्र सुरु करण्यात आले आहे. मातोश्री पुष्पादेवी दुगड अन्न छत्र ग्रूप तर्फे गरज असेल त्याला मोफत जेवण सुरु केले आहे.पोलीस अधिकार, वस्ती भागातील नागरिक, गरीब कष्टकरी मजूर अशांना ज्यांना दोन वेळचे जेवण देण्यास सुरुवात केली आहे. या अन्न छत्राचे उद्घाटन सहाय्यक आयुक्त स्वारगेट सर्जेराव बाबर, सुनील कलगुटकर, पोलीस निरीक्षक कुमार घाडगे यांच्या वतीने करण्यात आले.
दुगड ग्रुपच्या वतीने शहरी भागात 1500 तर ग्रामीण भागात 1750 एक महिना पुरेल इतके किराणा मालाचे किट दिलेले आहेत अशी माहिती प्रमोद दुगड यांनी दिली. ते पुूढे म्हणाले, हे किराणा किट दिल्यावर एक गोष्ट लक्षात आली अनेकांना तयार जेवणाची खूप आवश्यकता आहे. त्यामुळे दररोज किमान दोन ते तीन हजार नागरिक दोन वेळेस पोटभर जेवण करतील, अशी व्यवस्था तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात आम्ही यशस्वी झालो आहोत आमचे वडील माणिकचंद दुगड यांचा तीन मे रोजी वाढदिवस आहे.
त्यामुळे हा उपक्रम किमान तीन मे पर्यंत चालू ठेवण्याचा निश्चित केले आहे. लॉकडाऊन वाढल्यास अन्नछत्राचा कालावधी देखील वाढवणार आहे. या उपक्रमामुळे झोपडपट्टी भागात अनेक गरजूंना घरात ताजे जेवण मिळत असल्याने त्यांची पोटाची खळगी भरण्याची चिंता दूर झाली आहे. यावेळी कीर्तीराज दुगड, नेमीचंद सोलंकी, प्रकाश दुगड,महेंद्र सुदेंचा, प्रवीण दुगड, रविंद्र दुगड, डॉ.नितीन बोरा, गौरव दुगड, यांच्यासह दुगड परिवारातील सर्व सदस्य परिश्रम घेत आहेत.