Home ताज्या बातम्या अखेर बालयोद्ध्यानं करोना चक्रव्यूह भेदलचं…!

अखेर बालयोद्ध्यानं करोना चक्रव्यूह भेदलचं…!

0

संबंध जग करोनाच्या चक्रव्यूहात अडकलयं… होय, चक्रव्यूहचं म्हणायला हवं… कधी कोणाला लक्षणं दिसतात, तर कोणाला दिसत नाहीत.

असचं 18 महिन्यांचं बाळ अम्रित गोविंद कुमार निषाद, रायगडमधील उरण तालुक्यातील जासई येथे आई सुजादेवी आणि वडील गोविंद कुमार यांच्याबरोबर राहणारं… दिनांक 12 एप्रिल रोजी या बाळाला ताप आल्याचं निमित्त झालं, आई-वडिलांनी जासईतल्या संजीवनी हॉस्पिटलमधील डॉक्टरांकडे नेलं. चिमुकला ‍जीव बघून, त्यांनीही काळजीपोटी तात्काळ उरणच्या ग्रामीण रुग्णालयाला पाठविले. येथील शासकीय यंत्रणा तातडीने कामाला लागली, बाळाला तपासल्यानंतर त्याच्या जीवाला कोणत्याही प्रकारचा धोका नको म्हणून प्रत्येकजण सर्व प्रकारची काळजी घेत होते. त्याक्षणी निर्णय झाला, त्याच दिवशी कामोठे येथील एमजीएम इस्पितळात या बालयोद्ध्याला दाखल करण्याचा  अन् सातव्या दिवशी म्हणजेच 20 एप्रिलला हा बालयोद्धा करोनाच्या चक्रव्यूहात अडकला. इथून सुरू झाली त्याची हे करोना नामक चक्रव्यूह भेदण्याची कडवी झुंज..

रायगडचं नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र या बालयोद्ध्यासाठी प्रार्थना करीत होता. सात दिवस हा बालयोद्धा करोना नामक चक्रव्यूह भेदण्यासाठी शर्थीची झुंज देत होता आणि आज, सोमवार, दिनांक 27 एप्रिल 2020 रोजी सूर्य अस्ताला जाता जाता.. संध्याकाळी सहा वाजता अमृत गोविंद कुमार निषाद नावाच्या अवघ्या अठरा महिन्याच्या या बालयोद्ध्यानं हे करोना नामक महाभयंकर चक्रव्यूह भेदलं.. ज्याचं या क्षणालाही कोणाकडेच उत्तर नाही.

पहिल्या दिवसापासूनच रायगडच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे, जिल्हाधिकारी निधी चौधरी आणि त्यांचे सहकारी, पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख आणि त्यांचे सहकारी, एमजीएम हॉस्पिटलची संपूर्ण टीम, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रमोद गवई, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे, पनवेल कोविड हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.यमपल्ले आणि त्यांचे सहकारी, प्रांताधिकारी दत्तात्रय नवले, उरणचे तहसिलदार भाऊसाहेब अंधारे या सर्वांनी या बालयोद्ध्याला बळ देण्यासाठी प्रशासकीय, वैद्यकीय, आध्यात्मिक अशा सर्वच प्रकारचे शर्थीचे प्रयत्न केले होते. आज या सर्वांच्या प्रयत्नांना यश मिळाले अन्  हा बालयोद्धा करोना  नामक महाभयंकर चक्रव्यूह भेदून यशस्वीपणे परत आला. त्याचं, त्याच्या आई-वडिलांचं सर्वांनी टाळ्या वाजवून अभिनंदन तर केलंच परंतु या बालयोद्ध्याने जगालाही संदेश दिला..

खुद ही को कर बुलंद इतना की..

हर तकदीर से पहले खुदा बन्दे से खुद पुछे की..

बता तेरी रजा क्या है.. !